खानापूर तालुक्यात दमदार पाऊस
नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले : शेतकऱ्यांत समाधान, गावांचा संपर्क तुटण्याचा धोका वाढला
खानापूर : तालुक्यात मंगळवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. रात्री पावसाने जोर केला. तर बुधवारी पहाटेपासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली. दिवसभर पाऊस सुरुच होता. तालुक्यात सर्वदूर हा पाऊस सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तसेच तालुक्यातील सर्व तळी तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. पावसाचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर दिसून आला. गेल्या दोन दिवसापासून होणाऱ्या पावसाने भात लागवडीला चांगला हंगाम मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या होत्या. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर गेले पंधरा-वीस दिवस ऊन, पाऊस असा खेळ सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा होती. सोमवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली होती. मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस पडत होता. सायंकाळनंतर पावसाने जोर केल्याने रात्रभर पावसाचा जोर होता. तर बुधवारी दिवसभर पावसाने जोर केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गेले दोन दिवस अजिबात सूर्यदर्शन झालेले नाही.
गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. गेल्या वर्षात पाऊसच झाला नसल्याने तालुक्यातील सर्व नदी-नाले गेल्या पाच-सहा महिन्यापासून कोरडे पडले होते. जून महिन्यात पावसामुळे नदी-नाल्यांचे पात्र प्रवाहित झाले होते. सध्याच्या दमदार पावसाने तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. हा पाऊस खरीपाच्या भाताना पोषक असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात नट्टीची लागवड केली जाते. यासाठी पाण्याची आवश्यकता असते. या पावसामुळे नट्टीसाठी शेती तयार करण्यास पोषक झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास ानेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.