Maharashtra Monsoon पुणे - मुंबई एक्स्प्रेस वे ठप्प, राज्यात १३ जणांचा मृत्यू...महाराष्ट्रात अतिवृष्टीचा हाहाकार थांबेना
राज्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एकूण १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी मुंबई आणि तिच्या उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले, ज्यामुळे महानगर ठप्प झाले आणि भूस्खलन झाल्याने प्रशासनाला महत्त्वाचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद करावा लागला तसेच काही भागांतील रेल्वे वाहतूकही स्थगित करावी लागली.
मावळ जिल्ह्यातील दुर्घटना
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात भूस्खलनामुळे घर गाडले जाऊन दोन जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील खेड तालुक्यात पाण्याने भरलेल्या रस्त्यावर वाहून गेल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, गेल्या तीन ते चार दिवसांत पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
रेड अलर्ट जारी
पुढील दोन दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट जारी करण्यात आला आहे, असेही मंत्र महाजन यांनी सांगितले. एक मोठे उन्मळून पडलेले झाड हटवताना एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला, आणि ठाणे शहरात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये एक मोठा जाहिरात फलक आणि दोन भिंती कोसळल्या, अशी माहिती आपत्कालीन अधिकाऱ्यांनी दिली.
पालघरमध्येही पावसाचे थैमान
दरम्यान पालघरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याने एका निवासी शाळेतील पत्र्याच्या छपराच्या शेड उडून सोबतच झाडे उन्मळून टाकल्याची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत, शाळेतील सर्व ३५० विद्यार्थ्यांना कसलाही अपाय झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि शेजारील ठाणे व रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
रुळ वाहून गेला
कर्जत-लोणावळा भोर घाट विभागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने, मुंबई-पुणे या व्यस्त मार्गावरील रेल्वे सेवा सोमवारी पहाटे स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे लोवजी आणि डोलावली स्थानकांदरम्यानचा खडीचा थर (रुळांना आधार देणारा खडीचा थर) वाहून गेल्याने, मध्य रेल्वेने रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खोपोली दरम्यानची लोकल ट्रेन सेवा देखील स्थगित केली आहे, असे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अवघ्या दोन तासांत जवळपास ३०० मिमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत परिस्थिती आणखी बिकट झाली.
वेस्टर्न रेल्वेचे नियोजन बिघडले
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि प्रचंड पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेचे (WR) कामकाजही ठप्प झाले. त्यामुळे मुंबई आणि दक्षिण गुजरातमधील विविध स्थानकांवर २० हून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्या.
पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुसळधार पाऊस, पाणी साचणे आणि भूस्खलनामुळे ४० हून अधिक सेवांवर परिणाम झाला, ज्यात किमान आठ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले, १० रद्द करण्यात आल्या आणि इतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले किंवा त्या अल्पावधीतच थांबवण्यात आल्या.