गव्यांच्या कळपांकडून पिकांचे मोठे नुकसान
बॉम्बगोळ्यांचे आवाज, श्वान-नागरिकांच्या ओरडण्याच्या आवाजाची ध्वनिफीत लावून हुसकावण्याचा प्रयत्न
वार्ताहर/उचगाव
बसुर्ते, कोनेवाडी, बेकिनकेरे या गावातील शेतकऱ्यांची शेती वैजनाथ महिपाळगड या डोंगरपायथ्याशी आहे. गव्यांचे कळप या शेतवडीत सातत्याने घुसून शेतातील पिकांची प्रचंड नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली आहे. बॉम्बगोळ्यांचे व कुत्र्यांचा आवाज आणि नागरिकांकडून जोरजोराने ओरडण्याच्या आवाजाची ध्वनिफीत तयार करून रात्रभर हा आवाज शेतवडीमध्ये ठिकठिकाणी साऊंड स्पीकर लावून गोंधळ घालण्यात येत आहे. यामुळे थेड्या प्रमाणात गव्यांच्या कळपांना सध्या आळा बसला आहे. मात्र वनखात्याने यावर तातडीने उपाय करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी या भागातील असंख्य शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
शेतात थांबणे शेतकऱ्यांसाठी संकट
वैजनाथ डोंगर, महिपाळगड या डोंगर भागात गव्यांची मोठ्याप्रमाणात संख्या आहे. या जंगलातून रात्रीच्या वेळी बसुर्ते धरणातील पाणी पिण्यासाठी गव्यांचे कळप बसुर्ते, कोनेवाडी, बेकिनकेरे गावातील शेतकऱ्यांच्या शेतवडीत उतरत असतात. शेतवडीत, भाजीपाला, मका, मिरची, जोंधळा, बटाटे, भुईमूग अशी विविध पिके वर्षभर उन्हाळा, पावसाळा अशा वेगवेगळ्या ऋतूमध्ये घेतली जातात. या उभ्या पिकांमधून गव्यांचे कळपच्या कळप जाऊन शेतवडीतील पिकांचे मोठे नुकसान सातत्याने करत असतात. शेतात शेतकरी तळ ठोकून या जनावरांना हाकण्यासाठी थांबावे तरी हे प्रसंग जीवावर बेतणारेच असतात.
आवाजांमुळे बसतोय आळा
यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरतात. यासाठी सध्या शेतकऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली आहे. विविध आवाजाच्या ध्वनीफीत करून स्पीकरद्वारे शेतवडीत ठिकठिकाणी लावल्याने गव्यांचे कळप डोंगरातून खाली शेतवडीत येण्यासाठी थोडे भीत असल्याने यावरती थोडा आळा बसल्याचे चित्र सर्वत्र दिसून दिसून येत आहे. मात्र हे किती दिवस असेच करत राहणार. कारण सदर ध्वनिफीत दिवसभर चार्जिंग करावे लागते. आणि रात्री रोज जाऊन ते लावावे लागतात. म्हणजेच रोज संध्याकाळी लावणे आणि सकाळी जाऊन काढणे आणि दिवसभर चार्जिंग करणे हा उपद्व्याप आहे. हे किती दिवस शेतकऱ्यांना करावे लागणार? पिकांची होणारी नासधूस यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन कमी झाले असून जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने वनखात्याला आदेश देऊन तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी येथील तमाम शेतकरी वर्गाने केली आहे.