Heatwave In Maharashtra: 3 दिवस उष्णता आणखी वाढणार, हवामान खात्याची माहिती
येत्या तीन दिवसांत विनाकारण घराबाहेर पडू नये, IMD कडून आवाहन
Heatwave In Maharashtra : पुढील तीन ते चार दिवस राज्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. (India Meteorological Department) यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील काही जिल्ह्यात 12 ते 16 मे दरम्यान अधिक उष्णता असणार आहे. कोकण, गोवा येथे 12 मे आणि मराठवाड्यात 12 ते 15 मे दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्रासह गुजरात राज्यात 12 ते 14 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा देण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात उष्णतेने तापला असून उष्माघाताने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुढील तीन दिवसांत राज्यात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला असून तीन दिवसाचा उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे गेले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानचा आकडा 40 अंशाच्या पार गेला असल्याने नागरिक हैरान झाले आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार दिवसांत राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
देशात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
दरम्यान, पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता असून 12 व 16 मे रोजी काही भागांत अतितीव्र उष्ण रात्री अनुभवास येऊ शकतात. तसेच पूर्व राजस्थानमध्ये 17 ते 18 मे दरम्यान अतितीव्र उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.