महाराष्ट्रासह 12 राज्यात उष्णतेची लाट
काही ठिकाणी तापमान 43 अंशांवर : कर्नाटकसह 17 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हवामान खात्याने चालू आठवड्यातही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह 12 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. चालू आठवड्यातही तापमान खूप वाढणार असून तीव्र उष्णता जाणवणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशाराही देण्यात आला आहे. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आवश्यकता असल्यासच दुपारच्यावेळी घराबाहेर पडावे, असा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार बिहार, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात आणि तामिळनाडू या 12 राज्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होऊ शकते. शनिवारपासून पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या राज्यांतील 17 शहरांमध्ये शुक्रवारी दिवसाचे तापमान 43 अंशांच्या जवळ नोंदवले गेले. याचदरम्यान हवामान खात्याने बऱ्याच राज्यांमध्ये पावसाची शक्मयताही वर्तवली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकसह जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, अऊणाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे.
उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला
ओडिशा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि गुजरातचे कच्छ, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात पुढील चार-पाच दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्मयता आहे. हवामान खात्याने लोकांना उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी अधिक पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी सुती कपडे घालून, डोके झाकून किंवा माथ्यावर कापड गुंडाळून बाहेर जावे, असे आयएमडीने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात 16-20 एप्रिलदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या विविध भागात उष्णतेची लाट तीव्र झाली होती. तसेच उत्तर कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ, तटीय आंध्रप्रदेश व तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून आला. उष्मालाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या अनेक राज्यांमध्ये गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पाऊस अन् उष्णताही!
हवामान खात्याकडून रविवार, 21 एप्रिल रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट राहील. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये तीव्र उष्णता असेल. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडेल. तर अऊणाचल प्रदेशात हलका पाऊस अपेक्षित आहे.