पर्जन्यसरींनंतरही उष्मालाट तीव्र; मध्य प्रदेश, बिहारसह 14 राज्यात हलका पाऊस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील 14 राज्यांमध्ये रविवारी तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि अऊणाचल प्रदेशात काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मात्र, या किरकोळ पर्जन्यसरींनंतरही उष्मालाटेचा कहर कायम आहे. विशेषत: गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या 8 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला. या राज्यांतील तापमान 43 अंशांवर पोहोचले आहे.
आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे सर्वाधिक 44.5 अंश तापमानाची नोंद झाली. पुढील 4 दिवस म्हणजे 7 ते 10 एप्रिलपर्यंत मध्यप्रदेशात गारपीट आणि पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. 30 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्मयता आहे. बिहारमध्ये 16 शहरांच्या कमाल तापमानात घट झाली असून पुढील दोन-तीन दिवस उष्णतेची लाट जाणवणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. बिहारच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसू लागल्यामुळे राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास उष्णतेची लाट लक्षात घेता मुलांना नियोजित वेळेपूर्वी उन्हाळी सुटी देण्याचा विचारही सुरू आहे.
लडाखमध्ये 80 जणांची सुटका
दुसरीकडे, लडाखमधील चांग ला पासमध्ये बर्फवृष्टीमध्ये अडकलेल्या महिला आणि मुलांसह किमान 80 लोकांना लष्कराने वाचवले. मध्यरात्रीच्या सुमारास त्रिशूल विभागाच्या सैनिकांकडून मदत व बचावकार्य राबविण्यात आल्याचे लष्कराच्या लेहस्थित फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सांगितले. लेह आणि श्योक नदीखोऱ्यातील 17,688 फूट उंच चांग ला पासमध्ये ही कारवाई करण्यात आली.
17-18 एप्रिलपर्यंत दिलासा
स्कायमेटच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात चक्रीवादळ तयार होत असल्याचे दिसत आहे, तर एक लाट कर्नाटकपासून पूर्व मध्यप्रदेशपर्यंत पसरेल. याशिवाय पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळविरोधी प्रणाली तयार होत असल्यामुळे हवामानात आर्द्रता वाढेल. या आधारावर 17 किंवा 18 एप्रिलपर्यंत लोकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो.
बिहारमध्ये दक्षता उपाययोजना
संभाव्य उष्णतेच्या लाटेपासून सावधगिरी बाळगण्यासाठी बिहारमध्ये उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढलेल्या आदेशात शाळकरी मुलांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शाळा एकतर सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात किंवा उन्हाळी सुट्या नियोजित वेळेपूर्वी जाहीर कराव्यात, असे म्हटले आहे. यासोबतच सर्व ऊग्णालयांमध्ये औषधे आणि खाटा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या काळात सर्व जिह्यांमध्ये फिरती वैद्यकीय पथकेही तयार केली जाणार आहेत. याशिवाय सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये औषध म्हणून ओआरएसची पाकिटे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.