For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळजात लपलेला पिता

06:10 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
काळजात लपलेला पिता
Advertisement

साहित्यामध्ये, व्यवहारामध्ये मातृमहती मोठ्या गौरवाने गायली जाते. परंतु पितृप्रेमाकडे तेवढे लक्ष दिले जात नाही. पित्याची माया ही मुकी असते. ती दिसत नाही. अंतरीची कळकळ कधीकधीच प्रकट होते. बोलकी होते. बरेचदा तर आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाच्या आठवणी जाग्या होतात आणि नियती माणसाला त्या त्या वयाच्या टप्प्यावर आणून बसवते तेव्हा माणसाला ‘बाप’ कळतो.

Advertisement

श्रीमद् भागवतातल्या दोन कथा पुत्राने पित्याचा उद्धार केला हे सांगून मूल्यवर्धन आणि मूल्यरक्षणाचे मर्म सांगणाऱ्या आहेत. चतुर्थ स्कंधामध्ये ध्रुवाख्यान आहे. ध्रुवाचा पिता उत्तानपाद याला दोन राण्या होत्या. त्यातल्या नावडत्या राणीचा पुत्र ध्रुव हा होता. एकदा बालसुलभ स्वभावानुसार तो पित्याच्या मांडीवर बसायला गेला असता कठोर शब्द बोलून त्याला आवडत्या राणीने पित्यापासून वंचित केले. स्त्राrस्वाधीन राजा काहीही करू शकला नाही तेव्हा अपमानित बालध्रुव तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. भगवान श्रीहरींना प्रसन्न करून अढळपद मिळवून, पित्याची कीर्ती वाढवून जेव्हा तो राजधानीत परत आला तेव्हा उत्तानपाद राजा त्याला भेटायला सामोरा गेला. प्रेमाने आलिंगन देऊन त्याने त्याला अश्रूंनी स्नान घातले. ध्रुवाने यौवनावस्थेत पदार्पण केल्यावर राजाने त्याला राज्याभिषेक करून वनगमन केले. सप्तम स्कंधामध्ये प्रल्हादाची कथा आहे. हिरण्यकश्यपू या दैत्याचा पुत्र असलेला प्रल्हाद मात्र भगवद् भक्त आहे. विष्णूभक्तीपासून परावृत्त करण्यासाठी हिरण्यकश्यपुने आपल्या पुत्राचे हाल हाल केले. अनेकदा त्याला मृत्यूच्या दाढेतही लोटून दिले. भक्ताविषयी भगवंतांना अपार प्रेम असते तेव्हा भक्तरक्षणासाठी विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला नखांनी चिरून मारून टाकले. त्यानंतर मोठ्या प्रेमाने भगवंताने प्रल्हादाला मांडीवर घेतले. भगवंतांने आनंदाने प्रल्हादाला वर देऊ केले तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या पित्याला सद्गती द्या.’ भगवंत म्हणाले, ‘तुझ्या सत्कर्मांच्या जोरावरच त्याला सद्गती मिळेल. ती शक्ती माझ्यात नाही. तुझ्यासारखा पुत्र एकवीस पिढ्यांचा उद्धार करतो. तुझ्यासारख्या भक्तासाठी आज मी एका दैत्याला मांडीवर घेतले. माता-पिता दुराचारी असले आणि पुत्र सदाचारी असला तर त्या माता-पित्यांचा उद्धार होतो, पण माता-पिता सदाचारी असून पुत्र जर दुराचारी असेल तर माता-पित्यांचा उद्धार होऊ शकत नाही. त्यांना दुर्गती प्राप्त होते.

साहित्यामध्ये, व्यवहारामध्ये मातृमहती मोठ्या गौरवाने गायली जाते. परंतु पितृप्रेमाकडे तेवढे लक्ष दिले जात नाही. पित्याची माया ही मुकी असते. ती दिसत नाही. अंतरीची कळकळ कधीकधीच प्रकट होते. बोलकी होते. बरेचदा तर आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाच्या आठवणी जाग्या होतात आणि नियती माणसाला त्या त्या वयाच्या टप्प्यावर आणून बसवते तेव्हा माणसाला ‘बाप’ कळतो. कधीच न आकळलेल्या, न उकललेल्या गाठी अकस्मात सुटतात. आयुष्याचे रंगीत रीळ चित्रफीतीप्रमाणे एक एक प्रसंग उलगडत जाते, तेव्हा वाटते की हा गुप्त प्रवाह सोबत होता पण कळला कसा नाही? आई उमजते परंतु पिता कळतोच असे नाही. पित्याचे अस्तित्व डोलारा सांभाळणाऱ्या मजबूत खांबासारखे असते. पित्याची माया शब्दांतून ओथंबलेच असे नाही. जुन्या काळातली जात्यावरची एक ओवी अशी आहे-लहान मुलगा आईला विचारतो, ‘आई तू मुका घेशी, बाबा का बोलताती । पुत्र होवो वाचस्पती म्हणोनिया?’ आई पित्याचा मोठेपणा बालकाच्या मनावर ठसवते. बापाची पुत्राबद्दलची इच्छा असते की मुलाची हुशारी बघून मोठ्या विद्वानांनी विचारावे की तू कुणाचा मुलगा आहेस? पूर्वीची आई हा संस्कार करीत होती. ‘आई तू मायेची। बाबा का कठोर? । लेकाने व्हावे थोर । म्हणोनिया?’ ही ओवी याची साक्ष देते. बापाला मुलगी प्रिय असते. ती मोठी झाल्यावर सासरी जाणार ही कल्पनाही त्याला सहन होत नाही. ओवी अशी आहे-‘बाप म्हणे लेकी । लाडकी होऊ नको । जाशील परघरी । वेडी माया लावू नको?’ बापाची कसोटी संकटातच लागते आणि तेव्हाच त्याचे अंत:करणही कळते.

Advertisement

संतमंडळींना विश्वाच्या बापाची ओढ आहे. हा अलौकिक पिता पंढरपुरात विटेवर उभा आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘माझे माहेर पंढरी । आहे भीवरीचे तिरी । बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई?’ माहेर हा शब्द स्त्राrत्वाशी निगडित आहे, परंतु इथे संत एकनाथ महाराज माहेर असे म्हणत आहेत. पुरुषांनाही माहेर असते. हे आहे जीवाचे माहेर. जीवाचे शिवात रूपांतर होण्यासाठी सर्वांनाच हे मायबाप हाका घालत असतात. सद्गुरूंना शरण गेले की त्यांच्या कृपेने या माहेराची सतत आठवण राहते.

प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज श्री दत्त महाराजांना बाप म्हणून संबोधतात. ‘ये बा ये बा बापा दत्ता । चित्तासनी बैसे आता?’ एके ठिकाणी श्री दत्तप्रभूंना विनवणी करताना ते म्हणतात, ‘लोकी दत्ता ख्यात । आमुचा तू तात । मी बा तुझा पोत । हात धरी?’ तूच माझा पिता आहेस. तुझ्याशिवाय कळवळ्याने माझा हात कोण धरणार? संत ज्ञानदेव महाराजांनी लिहिलेल्या अभंगांची नाममुद्रा ‘बापरखुमादेवीवरु’ अशी आहे. ‘कृपासिंधू करुणाकरू बापरखुमादेवीवरु’ असे आजि सोनियाचा दिनु या अभंगात ते म्हणतात, तर रुणझुणु रुणझुणु रे भ्रमरा या अभंगात ‘सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा । बापरखुमादेवीवरू रे भ्रमरा?’ असे म्हणतात. यात अर्थरंग आणि अर्थाकार आहेत. रुखमादेवीचा पती पांडुरंग हा आपला पिता आहे असे सुचवताना त्यांच्या लौकिक माता-पित्याचे नावही हेच आहे हेही सांगून जातात. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे संत नामदेव महाराजांनी केलेले वर्णन वाचताना विठ्ठलभक्तांच्या डोळ्यातून सतत अश्रू न वाहिले तरच नवल! निवृत्तीनाथ यांनी ज्ञानदेवांचे दोन्ही कर हाती घेऊन त्यांना समाधीस्थळी नेले. नदीतल्या माशांना माजवण घातले. उदयअस्तावाचून तेव्हा दाही दिशा धुंद झाल्या. गगन कालवले. ज्ञानेश्वर महाराज आसनावर बसले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. संत नामदेव महाराज म्हणतात, ‘झाकियेले डोळे ज्ञानदेवे.’ ज्ञानदेवांनी समाधी घेतली तेव्हा महाराज म्हणतात, ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ?’  सारे विश्व ‘ज्ञानोबा माऊली’ म्हणून गजर करते. ज्ञानेश्वर माऊली ही विश्वजननी आहे. संत नामदेवमहाराज ज्ञानदेवांचा समाधीप्रसंग विव्हळून, अंतरातून सांगतात, ‘बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ.’ ज्ञानदेवांचे सगुण रूप दिसेनासे झाले तेव्हा सारेच कासावीस झाले. संत निवृत्तीनाथ व्याकुळ झाले. म्हणाले, ‘मायबापे आम्हा त्यागियले जेव्हा । ऐसे संकट तेव्हा झाले नाही?’ सूर्याला विश्वपिता म्हणतात कारण तो जगाचा आधार आहे. ज्ञानदेवांनी समाधी घेतली आणि आधारच लोपला. म्हणून कदाचित संत नामदेवमहाराज माऊलींना ‘बाप समाधिस्थ’ असे म्हणत असावेत.

शिवपुराणात शंकरविवाहाचा प्रसंग आहे. पुरोहित विवाहविधीप्रसंगी शंकरांना विचारतात, आपल्या पित्याचे नाव सांगा. तेव्हा नारद म्हणतात, ‘ब्रह्मदेव यांचे पिता आहेत.’ आजोबांचे नाव सांगा.. तेव्हा नारद म्हणाले, ‘भगवान विष्णू यांचे आजोबा आहेत.’ आता पणजोबांचे नाव सांगा असे म्हटले तेव्हा शंकर स्वत: म्हणाले, ‘माझा पणजोबा मीच आहे.’ तिन्ही जगाचे स्वामी असलेले शंकर सर्वांचे पिता आहेत. शंकर मृत्युंजय आहेत. कविराय रामजोशी यांचे एक पद आहे- ‘भज भज भवजलधिमाजी मनुजा शिवाला’.. त्यात ते म्हणतात, ‘सावध हो करिसि काय, शंकर गुरू बापमाय, चिंतुनी कवी रामपाय, हृदयी निवाला..’ मायेपासून सावध रहा, अजर-अमर अशा शिवचरणाचे ध्यान करून मुक्त व्हा, सर्व जीवांचे मायबाप हे शंकरच आहेत. सर्वांच्या काळजात लपलेल्या ‘बाप’ या नात्याला समजणे, उमजणे म्हणजे समृद्ध होत जाणे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.