Satara News | बावधनच्या बगाड्याचा मानकरी ठरला; भक्तिभावात देवासमोर लागला कौल
बगाड्याच्या निवडीने मंदिर परिसर मंत्रमुग्ध झाला
वाई - वाई तालुक्यातील बावधन येथे होळी पौर्णिमेच्या मध्यरात्री श्री श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात नवसाच्या बगाड्याची निवड मोठ्या भक्तिभावात पार पडली. रात्री बारा वाजताच मंदिरात सर्व भाविक एकत्र जमले होते. दैवी शांततेच्या वातावरणात नवस केलेल्या भाविकांनी देवासमोर कौलासाठी ओळीने बसून नाथांची प्रार्थना केली.
मंदिराचे पुजारी प्रत्येक नवसकर्त्याच्या नावाने नाथांना कौल लावत होते. प्रत्येक नावाचा पुकारा होताच क्षणभर परिसरात शांतता पसरत होती. अखेर देवांचा कौल लागल्यानंतर “काशीनाथाचे चांगभले!” या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
यावर्षीच्या बगाड्याचा मान श्री विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला. सुमारे १६ वर्षांपूर्वी बंधू रविंद्र सोपान कदम यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी नाथांना नवस केला होता. तो नवस पूर्णत्वास गेला असून त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाल्याने कदम कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांच्या बंधूंनाही बगाड्या होण्याचा मान मिळाला होता.बावधनची जगप्रसिद्ध बगाड यात्रा रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा गावाच्या एकजुटीचे, श्रद्धेचे आणि अध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानली जाते.