Kolhapur News: हवालदार साताप्पा गोविंद मिसाळ यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता
By : महेश तिरवडे
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील पडळीपैकी मिसाळवाडी येथील 27 वर्षांचा जवान हवालदार साताप्पा गोविंद मिसाळ हे फिरोजपुर पंजाब आर्टलरी रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सेवा बजावत असताना त्यांचा आकस्मित अपघाती मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर मिसाळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राधानगरी तालुक्यातील पडळीपैकी मिसाळवाडी येथील भारतीय सैन्यदलात फिरोजपुर पंजाब आर्टलरी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत असणारे जवान साताप्पा गोविंद मिसाळ यांचा सेवेत असताना (रविवारी १७ ऑगस्ट) रोजी विजेच्या धक्क्याने मृत झाले होते. मंगळवारी त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीर जवान तुझे सलाम, अमर रहे अमर रहे साताप्पा मिसाळ अमर रहे, जय जवान जय किसान.. च्या घोषणा देत तरुणांनी तालुक्यातील आणाजे ते दुर्गमानवाडमार्गे मिसाळवाडीपर्यंत घोषणा देत अंत्ययात्रा काढली. परिसरातील शेकडो लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले.
पंजाब येथून विशेष विमानाने पार्थिव कोल्हापूर येथे आणण्यात आले. कोल्हापूर येथून जवान साताप्पा मिसाळ यांचे पार्थिव सासुरवाडी आणाजे येथे सकाळी साडेदहा वाजता आणण्यात आलं. यावेळी आणाजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी पार्थिव असणाऱ्या वाहनावर फुलांचा वर्षाव करत श्रद्धांजली वाहिली. पार्थिव मिसाळवाडी येथे आणल्यानंतर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
एकुलता एक मुलगा देश सेवेच्या उर्मीतून बीएससी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत मोठ्या कष्टाने आर्मीमध्ये दाखल झाला. देशसेवेत कार्यरत असणाऱ्या मुलाचा आकस्मित मृत्यू झाल्याने आई, वडील बहिणीनं आक्रोश केला. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले. मिसाळवाडी, जोंधळेवाडी येथील मैदानावरती अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. मुसळधार पावसातही महिला आबालवृद्ध अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.
यावेळी सरपंच सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटळे, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर, ए. वाय. पाटील, दिपक शेट्टी, कॅप्टन अनिल देसाई, शिवाजी शेटके, तानाजी खाडे, लक्ष्मीकांत हांडे, संतोष कुमार, महादेव जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून कल्याण संघटक सुबेदार मेजर सुहास कांबळे, नायब तहसीलदार सुबोध वायगंकर यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. १०९ टीए बटालियनच्या जवानांनी मानवंदना दिली.