बेळगाव खरोखरच स्मार्ट झाले का?
शहरातील स्मार्ट सिटीची अनेक कामे पूर्ण तर काही अपूर्ण : कामांचा दर्जा घसरल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने देशातील काही निवडक शहरांसह बेळगावमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला. मात्र, स्मार्ट सिटीच्या कामांबाबत संमिश्र मतप्रवाह व्यक्त होत असून प्रकल्पाचे उद्दिष्ट कितपत पूर्ण झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2016 मध्ये बेळगावची निवड करण्यात आली. 11 मे 2016 पासून स्मार्ट सिटी लिमिटेडची सुरुवात झाली. प्रत्यक्षात 2017 मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, कोरोना व इतर कारणांमुळे कामांना विलंब झाला. तर 31 मार्च 2025 रोजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून 930 कोटी रुपयांचे अनुदान यासाठी खर्च करण्यात आले.
शहरातील विविध भागात हाती घेण्यात आलेल्या 107 कामांपैकी 103 कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, पूर्ण झालेल्या कामांपैकी बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण 60 कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी 25 कामे पूर्ण झाली असून ती महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. उर्वरित पाच कामांच्या हस्तांतरणासाठी पत्रक्यवहार करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाशी संबंधित 10 पैकी 4 कामे प्रगतीपथावर आहेत. तर 6 कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित 7, पोलीस खात्याशी संबंधित 1, नगरविकास खात्यासंबंधी 1 व इतर 5 कामे पूर्ण झाली असून ती संबंधित विभागांकडे हस्तांतरित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून हॉस्पिटल, तलाव, उद्यानांचा विकास, बसथांबे, रस्ते, आरओ प्लांट यासह इतर कामे करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी बहुतांश कामांचा दर्जा सुमार असल्याचा आरोप केला जात आहे. रस्ते, गटारी अवैज्ञानिकरीत्या निकृष्ट दर्जाच्या करण्यात आल्या आहेत.
मुख्य ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदारांना कामे दिली आहेत. त्यामुळे कामांचा दर्जा घसरला आहे. शुद्ध पाणी घटक आणि बसथांबे सुमार दर्जाचे बांधण्यात आल्याने अनेक ठिकाणी ते नादुरुस्त झाले आहेत. स्मार्ट सिटीतून शहरात करण्यात आलेल्या कामांचे हस्तांतर आणि दर्जाची पाहणी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून संयुक्तरीत्या केली जाणार आहे. त्यानंतर सर्व कामांचे हस्तांतर केले जाणार आहे.
पूर्ण झालेली कामे
कणबर्गी, किल्ला तलाव विकास, वंटमुरी येथे 30 बेडचे हॉस्पिटल, खाऊकट्टा, 11 स्मार्ट क्लासरूम, पटवर्धन, सराफ कॉलनी उद्यान विकास, 38 स्मार्ट बस शेल्टर, कौशल्य विकास केंद्र, वडगाव येथे 10 बेडचे हॉस्पिटल, हायटेक डिजिटल ग्रंथालय, 12 आरओ प्लांट, शहर बसस्थानक (सीबीटी), कला मंदिर बहुउद्देशीय व्यापार संकुल, पादचारी आणि पेव्हर्स रस्ते, भूमिगत वीजवाहिन्या यासह इतर काही कामे पूर्ण झाली आहेत. आरोग्य विभागाच्या व्हॅक्सिन डेपोतील चार कामे प्रगतीपथावर आहेत.