For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राष्ट्रकुल’ विजेत्यांसाठी हरियाणाकडून 13.47 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

07:11 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘राष्ट्रकुल’ विजेत्यांसाठी हरियाणाकडून 13 47 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

हरियाणा

हरियाणा सरकार 7 ऑगस्ट रोजी एका भव्य सत्कार समारंभाद्वारे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पदकविजेते आणि सहभागी खेळाडूंचा सन्मान करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना एकूण 13.47 कोटी रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

Advertisement

हरियाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांनी बुधवारी सांगितले की, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या राज्यातील पदक विजेत्या आणि सहभागी खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पंचकुला येथील सेक्टर 3 मधील ‘ताऊ देवी लाल स्टेडियम‘ येथे होणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि खेळाडूंना रोख बक्षिसे व प्रशस्तिपत्रे प्रदान करतील, असेही त्यांनी सांगितले.

गौतम म्हणाले की, हरियाणाच्या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय मंचावर पुन्हा एकदा आपले उत्कृष्ट क्रीडा नैपुण्य सिद्ध केले आहे. त्यांनी सांगितले की, हरियाणातील 10 खेळाडूंनी पदके जिंकली आहेत; यामध्ये सात सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.  हरियाणा सरकारच्या क्रीडा धोरणांतर्गत, पदक विजेते आणि सहभागी खेळाडूंना एकूण 13.47 कोटी रुपयांची रोख बक्षिसे वितरित केली जातील.

क्रीडा नैपुण्याला प्रोत्साहन

मंत्र्यांनी सांगितले की, सात सुवर्णपदक विजेत्यांपैकी प्रत्येकाला 1.50 कोटी रुपये, तर दोन रौप्यपदक विजेत्यांपैकी प्रत्येकाला 75 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्याला 50 लाख रुपये मिळतील. तसेच, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी 13 खेळाडूंना प्रत्येकी 7.50 लाख रुपये देऊन सन्मानित केले जाईल. राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट वातावरण उपलब्ध करून देणे हे हरियाणा सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मंगळवारी स्कॉटलंडहून परतलेल्या हरियाणाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वत: स्वागत केल्याचेही मंत्र्यांनी सांगितले; तिथे पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते.

क्रीडा पायाभूत सुविधा आणि प्रतिभेला चालना

गौतम यांनी असेही सांगितले की, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवलेले चौथे स्थान ही संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. भारतीय खेळाडूंनी आपल्या प्रतिभेच्या, शिस्तीच्या आणि अथक परिश्रमांच्या जोरावर देशासाठी जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे. तसेच, युवा पिढी त्यांच्या यशातून प्रेरणा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आधुनिक सुविधांची निर्मिती, स्टेडियमचा विस्तार, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि प्रगत क्रीडा साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करून राज्य सरकार क्रीडा पायाभूत सुविधा बळकट करत आहे. संसाधनांच्या अभावामुळे कोणत्याही प्रतिभावान खेळाडूला संधीपासून वंचित राहावे लागू नये, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही गौतम यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.