आशियाई स्पर्धेसाठी हरमनप्रीतकडेच नेतृत्व
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
येत्या सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले होते. पण निवड समितीने कौरवर पुन्हा विश्वास दाखविला आहे.
जपानमधील आशियाई स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. या आगामी स्पर्धेत टी-20 हा क्रीडा प्रकार खेळविला जाणार आहे. 2023 साली चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक मिळविले होते. जपानमधील या आगामी स्पर्धेत पुरूष आणि महिलांची टी-20 स्पर्धा घेतली जाणार आहे.
37 वर्षीय हरमनप्रीत कौरने गेल्या वर्षी आयसीसी विश्वचषक महिलांची क्रिकेट स्पर्धा भारताला जिंकून दिली होती. त्यानंतर इंग्लंडसमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खराब कामगिरीनंतर भारतीय महिला संघावर जोरदार टीका होत आहे. या आगामी स्पर्धेसाठी यष्टीरक्षक आणि फलंदाज यास्तिका भाटीयाला वगळण्यात आले आहे. तर जी. कमलिनीला संधी देण्यात आली आहे. स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून राहील. शेफाली वर्मा, रॉड्रिग्ज, रिचा घोष यांच्यावर फलंदाजीची भिस्त तर दीप्ती शर्मा, रेणूका सिंग ठाकुर, श्रीचरणी, अरुंधती रे•ाr आणि नंदिनी शर्मा यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील. भारतीय महिला संघाला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्राथमिक फेरीतूनच बाहेर पडावे लागले असले तरी हा संघ 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
भारती संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जी. कमलिनी, भारती फुलमाली, श्रीचरणी, रेणूकासिंग ठाकुर, क्रांती गौड, अरुंधती रे•ाr, श्रेयंका पाटील, राधा यादव, नंदिनी शर्मा.