कामगारांना नाहक त्रास देण्याचा प्रकार थांबवावा
बांधकाम संघटनेचे कामगार आयुक्तांना निवेदन
बेळगाव : कामगारांचे अर्ज रद्द ठरविले जात आहेत. ओळखपत्राचे नुतनीकरण करताना जाणूनबुजून चुका काढल्या जात आहेत. तुमच्या अर्जामध्ये चुका आहेत, असे सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कामगारांना विविध सरकारी योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. तेंव्हा कामगारांना मार्गदर्शन करून तातडीने ओळखपत्र द्यावीत, यासह इतर मागण्यांसाठी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. कामगारांना लग्नासाठी, त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी निधी दिला जातो. मात्र तो निधी वेळेत दिला जात नाही. त्यामुळे कामगारांना त्याचा नाहक त्रास होत आहे. आरोग्य योजना लागू आहे. त्यासाठी देखील निधी जमा केला जातो. मात्र तो निधी वेळेत जमा केला जात नाही. त्यामुळे कामगारांना अडचणी निर्माण होत आहेत. अर्ज योग्यप्रकारे भरुन दिल्यानंतरही त्यामध्ये चुका असल्याचे खोटे सांगितले जात आहे. त्यामुळे नाहक त्रास होत आहे. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वेळेत दिली जात नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांतून कामगारांना शुल्क भरा म्हणून सांगितले जात आहे. जर वेळेत शिष्यवृत्ती दिली तर संबंधित शाळा, महाविद्यालय या ठिकाणी लवकर शुल्क भरता येते. तेंव्हा तातडीने शिष्यवृत्ती द्यावी. कामगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामगारांना सर्व ते सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त अन्सारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, राहुल पाटील, सुनील गावडे, शितल बिलावर, अॅड. यशवंत लमाणी, उमेश पाटील, पत्र्याप्पा हिरेमठ, रमेश काकतीकर यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.