‘ग्रीन लंग्स’द्वारे शहराना हिरवाई
वृक्ष लागवडीमुळे शहरे होणार हिरवीगार : वन, नगरविकास खात्याचा संयुक्त उपक्रम,योजनेसाठी पालिका, महापालिकेचा पाठिंबा
पणजी : दरवर्षी राज्यात तापमान वाढत आहे. त्यामुळे साहजिकच हवामानात बदल होत आहे. वाढते तापमान व बदलते हवामान यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभाग आणि नगरविकास विभाग यांच्यातर्फे संयुक्त प्रयत्न राबविले जात आहेत. या दोन्ही संकटांना परतवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ग्रीन लंग्स’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, याला राज्यातील सर्व पालिकांनी हिरवा कंदील दाखवला आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ‘ग्रीन लंग्स’ या उपक्रमाविषयी चर्चा करण्यासाठी पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात, राज्यातील सर्व पालिकांचे नगराध्यक्ष, वनविभागाचे प्रमुख, नगरविकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शहरी हिरवाई वाढणार
‘ग्रीन लंग्स’ या प्रकल्पाविषयी बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, हा उपक्रम राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहे. ही योजना नागरी परिसरात हिरवाई वाढवून निसर्ग सुरक्षित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे शहरातील प्रदूषण कमी करणे, जैवविविधतेला चालणा देणे आणि शहरातील लोकांनाही उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी हा उपक्रम प्रभावशाली ठरेल, असा विश्वासही मंत्री राणे यांनी व्यक्त केला आहे.
गावांनाही होणार लाभ
मंत्री राणे म्हणाले, हवामान बदल आणि वाढत्या शहरी तापमानाचा सामना करण्यासाठी वन विभाग, नगरविकास विभागाच्या सहकार्याने गोव्यातील नगरपालिकांमध्ये एक परिवर्तनकारी शहरी वनीकरण उपक्रम सुरू होणार असल्याने त्याचा फायदा केवळ शहरालाच नव्हे, तर गावालाही होणार आहे. या योजनेचे ध्येय ‘हिरवे फुफ्फुस’ निर्माण करणे आहे, म्हणजेच हिरवीगार जागा जी हवेची गुणवत्ता सुधारेल, जैवविविधतेला आधार देईल आणि नागरिकांना सावलीत, निरोगी सार्वजनिक वातावरण देईल, असेही मंत्री राणे म्हणले.
सर्वांशी संवाद महत्वाचा
‘ग्रीन लंग्स’ या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी कृतीशील पावले उचलण्यावर तपशीलवार सादरीकरणे आणि परस्परसंवादी चर्चा करण्यात आल्या. पायलट प्रकल्पांसाठी नगरपालिका क्षेत्रातील व्यवहार्य जागा ओळखण्यात आणि त्यांना पाठिंबा देण्यात वन विभागाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला. संबंधितांच्या कल्पना, सूचना आणि संरेखित दृष्टिकोनांच्या देवाणघेवाणीने या महत्त्वाच्या हरित उपक्रमाच्या समन्वित आणि शाश्वत अंमलबजावणीचा पाया रचण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. ‘ग्रीन लंग्स’ या उपक्रमाला राज्यातील पालिकांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याने ओला कचरा, पावसाचे पाणी अडविणे, नैसर्गिक संसाधने वापरून शहरांमध्येही हरित वातावरण निर्माण करणे या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. ‘ग्रीन लंग्स’ हा प्रकल्प वनविभाग आणि नगरविकास विभाग यांच्यामार्फत कार्य करेल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. ‘ग्रीन लंग्स’ ह्या प्रकल्पात प्रामुख्याने सोनसडा या ठिकाणी मियावाकी पद्धतीने जंगल निर्माण करणे, शहरी क्षेत्रात व्हर्टिकल गार्डन्स निर्मिती, वाया जाणारे पावसाचे पाणी वाचवून त्याचा वापर सिंचनासाठी करणे, स्थानिक जैवविविधतेला प्राधान्य देणे, शाश्वत आणि पर्यावरण पूरक प्रकल्पाचे डिझाईन आदी गोष्टींवर चर्चा करण्यात आल्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.