‘ग्रीन सान्वी’ची होर्मुझमधून आगेकूच
महायुद्धादरम्यान इराणने भारतीय एलपीजी टँकरला दिला सुरक्षित मार्ग
वृत्तसंस्था/ तेहरान
पश्चिम आशियामध्ये युद्धाची आग भडकलेली असताना ऊर्जा सुरक्षेच्या आघाडीवर भारतासाठी एक मोठी आणि आश्वासक बातमी समोर आली आहे. भारताचा सातवा एलपीजी टँकर ‘ग्रीन सान्वी’ सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सागरी मार्गावर केंद्रित झाले असताना आणि जागतिक तेल पुरवठ्याबाबत अनिश्चितता कायम असताना भारताच्या दृष्टीने ही सकारात्मक वाटचाल सुरू झाली आहे.
भारतीय ध्वज असलेल्या ‘ग्रीन सान्वी’ या एलपीजी टँकरने 3 एप्रिल 2026 च्या रात्री हा संवेदनशील मार्ग सुरक्षितपणे पार केला. हे जहाज भारताच्या देशांतर्गत इंधनाच्या गरजांसाठी अत्यावश्यक असलेला अंदाजे 46,650 मेट्रिक टन एलपीजी माल घेऊन जात आहे. ‘ग्रीन सान्वी’च्या यशस्वी मार्गक्रमणानंतर, ‘ग्रीन आशा’ आणि ‘जग विक्रम’ या आणखी दोन भारतीय टँकर्सच्या सुरक्षित परतीची योजना आखली जात आहे. आता पुढील टप्प्यात ही दोन जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या दिशेने प्रवास करतील.
‘क्यू’ मध्ये आणखीही भारतीय कंटेनर
पश्चिम आशियातील युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण सात भारतीय एलपीजी टँकर्सनी या मार्गावरून यशस्वीपणे मार्गक्रमण केले आहे. सध्या, पर्शियन आखातात एकूण 17 भारतीय जहाजे उपस्थित आहेत. या जहाजांमध्ये तीन एलपीजी टँकर्स, चार कच्चे तेल टँकर्स, एक एलएनजी टँकर आणि एक रासायनिक उत्पादनांचा टँकर यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तीन कंटेनर जहाजे, दोन बल्क कॅरियर्स आणि दोन जहाजे नियमित दुरुस्तीसाठी तेथे तैनात आहेत. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
भारताच्या यशस्वी राजनैतिक धोरणाचा परिणाम
जहाजांचा हा सुरक्षित प्रवास भारताच्या सक्रिय राजनैतिक धोरणाचा परिणाम म्हणून पाहिला जात आहे. भारताने आपल्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी इराणसोबत उच्चस्तरीय राजनैतिक संवाद सुरू ठेवला आहे. इराणसोबत समन्वय राखणाऱ्या आणि मित्रदेशांच्या जहाजांना मार्ग दिला जात आहे. या यादीत भारतासह चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तानसारख्या देशांचा समावेश आहे.