उचगाव-कोवाड रोडवरील गवतगंजी जळून खाक
गोपाळ पावशे कुटुंबीयांचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव येथे दोन गवत गंजींना शनिवार दि. 6 एप्रिल रोजी पहाटे आग लागून अंदाजे 60 हजार ऊपयांचे नुकसान झाल्याची घटना पहाटे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, उचगाव-कोवाड रोडवरील शेतवडीमध्ये राहत असलेल्या गोपाळ लक्ष्मण पावशे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढील एक वर्षासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी आठ ट्रॅक्टर ट्रॉल्या गवत दोन गंज्या घालून ठेवल्या होत्या. शनिवारी पहाटे अकस्मात या दोन गवतगंज्यांनी पेट घेतला. सदर आगीचा लोट उडत असल्याचे चित्र दिसताच लागलीच त्या कुटुंबाने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना जमा केले व आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आता उष्णता जास्त असल्याने आणि पाण्याचा तुटवडा असल्याने संपूर्ण गवत या आगीत भस्मसात झाले. अग्निशमन दलाला फोन करून पाण्याची गाडी मागविण्यात आली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. जवळजवळ अर्ध्या तासाने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त गवतगंजी जळून खाक झालेल्या होत्या. संपूर्ण वर्षभराच्या गुरांचा चारा जळून गेल्याने गोपाळ लक्ष्मण पावशे यांच्यासमोर आता वर्षभराच्या चाऱ्यासाठी गुरांची काळजी लागून राहिलेली आहे. या घटनेचा रितसर पंचनामा करून गोपाळ पावशे यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.