‘नीट’ परीक्षार्थींचे ‘ग्रेस मार्क’ रद्द होणार
केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती : पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय
23 जूनला पुन्हा परीक्षा
- ग्रेस मार्क देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा 23 जूनला परीक्षा
- प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नाकारला
- नीट परीक्षा घोटाळाप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत 1 हजार 563 परीक्षार्थींना देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. या परीक्षार्थींना पुन्हा ही परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला असून त्यासाठी 23 जूनला परीक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच 30 जूनपर्यंत या परीक्षेचा परिणाम घोषित करण्यात येणार आहे. प्राधिकरणाने स्थापन केलेल्या समितीने या संदर्भातील आपला अहवाल आमच्या समोर ठेवला आहे. त्यानुसार ग्रेस मार्क देण्यात आलेल्या 1 हजार 563 परीक्षार्थींच्या गुणपत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्यापैकी जे परीक्षार्थी पुन्हा नीट-युजी परीक्षा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जे परीक्षार्थी ही परीक्षा देणार नाहीत, त्यांना ग्रेस मार्ग वगळता त्यांनी जे गुण मिळविले आहेत, त्यांची गुणपत्रिका देण्यात येणार आहे, अशी नोंद अहवालात आहे, असे न्यायालयाच्या सुटीतील खंडपीठाने स्पष्ट केले.
गुरुवारी घोषणा
ग्रेस मार्क देण्यात आलेल्या परीक्षार्थींसाठी नव्या परीक्षेची घोषणा प्राधिकारणाने गुरुवारी केली आहे. 30 जूनपर्यंत या परीक्षेचा परिणाम घोषित करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. या सूचनेचे पालन प्राधिकरणाकडून केले जाणार आहे. 6 जुलैपासून कौन्सिलिंगला प्रारंभ होणार असून त्यावर या नव्या परीक्षेचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एनटीएने विश्वास गमावला
एनटीए या संस्थेने या नीट घोटाळा प्रकरणामुळे आपला विश्वास गमावला आहे, असा आरोप या प्रकरणी याचिका सादर करणाऱ्या याचिकाकर्त्याने केला. आपली चूक एनटीएला आज न्यायालयात मान्य करावी लागली. या संस्थेने आणखीही अनेक चुका केल्या असतील, ज्या आमच्यासमोर आलेल्या नाहीत. त्यामुळे या संस्थेवरील विश्वासाला हादरा बसलेला आहे, असे प्रतिपादन याचिकाकर्त्याने केले.
प्रकरण काय आहे...
2024 ची नीट-युजी परीक्षा 5 मे 2024 या दिवशी घेण्यात आली. या परीक्षेला साधारणत: 24 लाख परीक्षार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल 4 जूनला घोषित करण्यात आला. मात्र, यासंबंधी मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले. तब्बल 67 विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व गुण मिळाल्याचे दिसून आले. त्यांच्यापैकी 6 विद्यार्थी एकाच केंद्रातील असल्याचे समजल्यानंतर संशय अधिकच बळावला. प्रश्नपत्रिका फुटल्याचाही आरोप अनेक परीक्षार्थींनी केला. त्यानंतर विविध उच्च न्यायालयांमध्ये याचिका सादर करण्यात आल्या. त्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्या. त्यांची एकत्रित सुनावणी सध्या होत आहे.
दोषींवर कारवाई होणार
नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. तथापि, या परीक्षेची कोणतीही प्रश्नप्रत्रिका फुटलेली नाही. प्रश्नप्रत्रिका फुटल्याचा आरोप धादांत खोटा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सर्वोच्च न्यायालयालाही सर्व माहिती देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची सज्जता करण्यात आली आहे, अशी माहितीही प्रधान यांच्याकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली.