गोपाळ देशपांडेंकडून दहा हजार सुविचार लिहून पूर्ण
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून विक्रम नोंद
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बेळगावचे गोपाळ देशपांडे यांनी 2023 पासून मे 2026 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहा हजार सुविचार लिहून पूर्ण केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने याची नोंद घेऊन त्यांची मुलाखत घेतली व राष्ट्रीय स्तरावरील हा विक्रम असल्याचे जाहीर केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांना ‘मॅक्झिमम मोटिव्हेशनल थॉट्स रिटर्न बाय अॅन इंडिविज्युअल इन कन्नड’ या किताबाने गौरविले.
याची सुरुवातसुद्धा अतिशय रोचक पद्धतीने झाली. गोपाळ यांना कानडी हस्ताक्षर सुधारावयाचे होते. यासाठी त्यांनी दररोज काही लेखन करावे, असे त्यांची मुले आनंद व अक्षता यांनी सांगितले. एकदा बेंगळूरला जात असताना चहासाठी महामार्गावर थांबल्यावेळी चहाच्या एका छोटेखानी दुकानाबाहेर एका फलकावर उत्तम हस्ताक्षरात सुविचार लिहिला होता. याबद्दल विचारताच आपल्याला दररोज नवीन सुविचार लिहिण्याची सवय आहे. त्यामुळे मला स्वत:ला आणि दुकानाला भेट देणाऱ्या सर्वांनाच प्रेरणा मिळते, असे दुकानदाराने सांगितले.
प्रवासादरम्यान गोपाळ यांच्या मनात आपणही असे सुविचार लिहावेत, असा विचार आला आणि त्यांनी विविध कानडी वृत्तपत्रे पाहून जे जे चांगले विचार मिळाले ते लिहिण्यास प्रारंभ केला. गोपाळ हायलॉक हैड्रोटेक्निक येथे अभियंता म्हणून काम करतात. व्यवसायानिमित्त त्यांना प्रवास करावा लागतो. प्रवासात ते नेहमी ए-5 आकाराची स्पायरल बायंडिंगची वही सोबत ठेवतात आणि सतत लिखाण करतात. 2023 ते 2026 मे पर्यंत त्यांनी यश, मानवी वर्तन, श्रद्धा, शिष्टाचार आणि वागणूक असे दहा हजार सुविचार लिहून पूर्ण केले. लोकांनी सतत विचारणा केल्यानंतर त्यांनी इंटरनेटवर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सबद्दल माहिती शोधली. बुक्सने त्यांची मुलाखत घेऊन हा राष्ट्रीय विक्रम ठरू शकतो, असे सांगितले. त्यानंतर 1430 पानांचे स्कॅनिंग करून देशपांडे यांनी सर्व दहा हजार सुविचार त्यांना पाठविले व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने या रेकॉर्ड्सची नोंद केली.