शुभ मंगल...पालक ते भटजी सावधान
कोल्हापूर / विनोद सावंत :
लग्नाची कामे घेण्यासाठी इव्हेंट चालकांमध्ये स्पर्धाच लागली आहे. अशा प्रकारे लग्नाची कामे घेण्याऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे. बाल विवाह करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. यापूर्वी केवळ बाल विवाह करणारे आणि त्यांचे पालक, नातेवाईकांवर कारवाई केली जात होती. आता लग्न लावणाऱ्या भटजीपासून ते मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.
कोल्हापुरात बाल विवाह काही नवीन नाही. यापुर्वीही बालविवाहांवर कारवाई झाली असल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत. प्रारंभी 2019 मधील कायदानुसार ही कारवाई होत होती. 2006 मध्ये यात आमुलाग्र बदल झाले. यापुर्वी बालविवाह करणारे आणि त्यांच्या पालकांवर कारवाई केली जात होती. आता बाल विवाह करणाऱ्यांसोबतच यात सहभागी होणारे धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
- 32 बाल विवाह रोखले, 11 प्रकरणी गुन्हे दाखल
प्रशासनाने गेल्या 14 महिन्यांत 32 बाल विवाह रोखले आहेत. 11 प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. तर 11 बाल विवाह झाले असल्याची नेंद प्रशासनाकडे आहे.
- कोणाची गय केली जाणार नाही : जिल्हाधिकारी
बाल विवाह होत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणातील संबंधितांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे सक्त आदेश जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी नुकतेच बाल विवाह संदर्भात झालेल्या बैठकीत संबंधितांना दिले आहेत. बाल विवाह सहभागी होणारे धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजत्रीवरही कारवाईचे त्यांनी आदेश दिले आहेत.
- लग्न लावणारे भटजीही रडारावर
नागदेववाडी येथे नुकतेच बाल विवाह करणाऱ्यांवर कारवाई झाली. विशेष म्हणजे या प्रकरणी नवरदेव, मुलीचे आई, वडील, भाऊ, कार्यालयाचे मालक, कार्यालयाचे व्यवस्थापकसह भटजीवरही गुन्हा दाखल झाला. भटजीवर कारवाई होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.
- अधिकाऱ्यांची नियुक्ती
बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बाल विवाहास प्रतिबंध म्हणून नियुक्ती केली आहे.
- 2006 चा कायदा
बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 हा कायदा बालविवाहांना प्रतिबंधित करण्याचा आणि त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो. बालविवाह रोखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे. या कायद्यानुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा किंवा 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विवाह बालविवाह मानला जातो आणि तो कायदेशीरदृष्ट्या अवैध आहे.
- दोन वर्ष कारवास, एक लाख दंड
बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्यांना शिक्षा, बालविवाह नोंदणीस प्रतिबंध, बालविवाह रद्द करणे, बालविवाहातील मुला-मुलींचे संरक्षण. जो कोणी बालविवाह करेल, बाल विवाहाचे आयोजन करेल किंवा प्रोत्साहन करेल दोन वर्ष कारवास आणि 1 लाख दंड केला जातो.
- टोल फ्रीवर तक्रार करा
पोलिस पाटील, ग्रामसेवक, आंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक यांची समिती नेमली आहे. याचबरोबर 10 टिमच्या मार्फत जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबविले. मंगल कार्यालय चालकांसह सर्वांकडे जावून कायदाची माहिती दिली. दोन वर्षात 40 बाल विवाह रोखले आहेत. येथून बाल विवाह होत असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1098 किंवा 112 यावर कळवावे.
सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
महिना बाल विवाह घटना रोखलेले झालेले गुन्हा नोंद
एप्रिल 2024 5 3 2 2
मे 2024 2 1 1 1
जुन 5 4 1 1
जुलै 2 2 0 0
ऑगस्ट 4 3 1 1
सप्टेंबर 2 1 1 1
ऑक्टोंबर 0 0 0 0
नोव्हेंबर 0 0 0 0
डिसेंबर 4 3 1 1
जानेवारी 4 2 2 2
फेब्रवारी 4 4 0 0
मार्च 4 4 0 0
एप्रिल 5 3 2 2
मे 2 2 0 0
एकूण 43 32 11 11