For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोंधळी गल्ली’ बेळगावच्या सांस्कृतिक वारशाची जिवंत साक्ष

11:03 AM Sep 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘गोंधळी गल्ली’ बेळगावच्या सांस्कृतिक वारशाची जिवंत साक्ष
Advertisement

बेळगावातील गोंधळी गल्लीचा समृद्ध इतिहास अन् सामाजिक योगदान

Advertisement

बेळगाव : बेळगाव हे शहर ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेसाठीही प्रसिद्ध आहे. या शहरातील अनेक गल्ली बोळांनी आजवर अनेक संस्कृतींचे, परंपरांचे आणि संघर्षांचे साक्षीदार म्हणून आपली खास ओळख निर्माण केली आहे. या गल्ल्यांनी केवळ वस्तीचा विकास केला नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचेही जतन केले आहे. ‘माझं वेणुग्राम’ ही विशेष डॉक्युमेंटरी मालिका तरुण भारत वृत्तपत्र आणि तरुण भारत न्यूज या डिजिटल माध्यमांद्वारे सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या चौथ्या पर्वात ‘गोंधळी गल्ली’ या बेळगावच्या एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण गल्लीला समर्पित करण्यात आले आहे. ही गल्ली बेळगावच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक म्हणून आजही ओळखली जाते.

नावामागील कथा-समाजजीवन

Advertisement

‘गोंधळी गल्ली’ हे नाव ऐकताच एका विशिष्ट समाजाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. हे नाव केवळ योगायोगाने पडलेले नाही, तर त्या समाजाच्या पारंपरिक व्यवसायामुळे हे नाव रुढ झाले आहे. पूर्वी या गल्लीत गोंधळी समाजाची अनेक घरे होती. देवाच्या गोंधळाची परंपरा, धार्मिक जागरण आणि विविध सण-समारंभांमध्ये गोंधळी समाजाची महत्त्वाची भूमिका असे. त्यांच्या धार्मिक सेवांमुळे या गल्लीस ‘गोंधळी गल्ली’ असे नाव मिळाले आणि तेच पुढे तिची ओळख बनले. गोंधळी समाज केवळ आपल्या परंपरेपुरता सीमित राहिला नाही तर धार्मिक संस्कृतीचा एक अभिन्न भाग बनून उभा राहिला. गावातील प्रत्येक मंगल प्रसंग, सण, यात्रा यामध्ये देवाचा गोंधळ हा अनिवार्य भाग ठरला आहे.

इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचा गाभा

या गल्लीत अनेक थोर व्यक्तींच्या वास्तव्याचा किंवा संबंधाचा उल्लेख सापडतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या दौऱ्यांदरम्यान या गल्लीत काही काळ वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. विशेषत: स्वातंत्र्य चळवळीदरम्यान बेळगावमधील त्यांच्या सहवासातील ही जागा ऐतिहासिक महत्त्व धारण करते. याचबरोबर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनमध्ये जाऊन शेकडो जखमी सैनिकांवर उपचार करणारे, आपले आयुष्य देशासाठी अर्पण करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या बहिणीचे (खोत) यांचे घरही या गल्लीत आहे.

शैक्षणिक-न्यायव्यवस्थेतील योगदान

ही गल्ली केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोडींपुरती सीमित राहिली नाही. येथे अनेक प्रबुद्ध, शिक्षणव्रती, वकील आणि बॅरिस्टर होऊन गेले. त्यामुळे या गल्लीत शिकवणुकीची परंपरा रुजलेली होती. सुशिक्षित, कर्तबगार नागरिकांचे हे निवासस्थान म्हणूनही या गल्लीकडे पाहिले जात होते. त्यामुळेच ‘गोंधळी गल्ली’ ही एक बौद्धिकदृष्ट्या समृद्ध गल्ली म्हणूनही ओळखली जाऊ लागली.

भौगोलिक-सामाजिक समरसतेचा नमुना

भौगोलिकदृष्ट्या या गल्लीत पश्चिमेला यंदे खूट ही सीमा मानली जात होती. या परिसरात विविध समाजांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. हिंदू, मुस्लीम, ब्राह्मण, मराठा, गोंधळी, परीट अशा विविध जाती-जमाती एकत्र राहत असल्यामुळे हा भाग सामाजिक एकतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

वेताळ देवस्थान अन् धार्मिक आस्था

या भागाचा धार्मिक इतिहासही वैशिष्ट्यापूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा माल येथे तपासला जात असे आणि बऱ्याच वेळा लुटीच्या घटना घडत असत. ब्रिटिश काळातील जाचक अटी आणि लुटारुंपासून संरक्षण मिळावे यासाठी या गल्लीत वेतोबा देवाची स्थापना करण्यात आली होती. कालांतराने हे देवस्थान ‘जागृत वेताळ देवस्थान’ म्हणून प्रसिद्ध झाले. आजही पंचक्रोशीतून भाविक येथे दर्शनासाठी येतात, ही त्या देवस्थानी असलेल्या श्रद्धेची साक्ष आहे.

सण, उत्सव, देखावे- एक सांस्कृतिक पर्वणी

गोंधळी गल्ली ही केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही. तर सण-उत्सवांमधून तिची आधुनिक ओळखही अधिक ठळक होते. शिवजयंती असो किंवा गणेशोत्सव मिरवणूक, या गल्लीतून साकारले जाणारे सजीव देखावे संपूर्ण बेळगावकरांना भुरळ घालतात. पूर्वीची जुनी ढमणी (म्हणजे बैलगाडी) वापरून काढले जाणारे हे देखावे लोकसंस्कृतीचे प्रतीक बनले होते.

गोंधळी गल्ली : कालातीत परंपरेची साक्ष

गोंधळी गल्ली ही केवळ एक भौगोलिक स्थळ नाही, ती आहे बेळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरेची सजीव साक्ष. इथला इतिहास हा केवळ वाचनापुरता न राहता अनुभवण्याजोगा आहे. गोंधळी समाजाची धार्मिक सेवा, परीट समाजाचे श्रमशील जीवन, थोर व्यक्तिमत्त्वांचे वास्तव्य, सामाजिक सलोखा, धार्मिक श्रद्धा, सणांची उत्सवमयता-हे सारे काही या एका गल्लीत एकवटले आहे. आजच्या आधुनिक बेळगावात, या गल्लीतून आपल्या मूळ सांस्कृतिक ओळखीची जाणीव जागवण्याची नितांत गरज आहे. कारण इतिहास जपणे म्हणजे केवळ भूतकाळात रमणे नव्हे, तर भविष्यासाठी मजबूत पाया घालणे आहे आणि गोंधळी गल्ली त्याचे उत्तम उदाहरण आहे.

Advertisement
Tags :

.