शबरीमलात सोनेचोरी अनुमानाहून जास्त
वृत्तसंस्था/तिरुवनंतपुरम
केरळमधील जगप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरीचे प्रकरण सध्या गाजत आहे. या चोरीचे प्रमाण आधी अनुमान करण्यात आले होते, त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे, अशी माहिती या प्रकरणाचे अन्वेषण करणाऱ्या विशेष तपास दलाने न्यायालयात सादर केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या देवस्थानाकडे मोठ्या प्रमाणात सोने आहे. ते सर्व भक्तांनी दान केलेले सोने आहे. मात्र, गेली कित्येक वर्षे या सोन्याची पद्धतशीर प्रकारे चोरी केली जात आहे, असे उघडकीस आले आहे. त्यामुळे केरळ प्रशासनाने हे प्रकरण तपासासाठी विशेष कृती दलाकडे सोपविले असून न्यायालयातही या प्रकरणासंबंधी सुनावणी केली जात आहे. या मंदिरातून सोन्याच्या अनेक वस्तू, उपकरणी आणि देवतांच्या मूर्ती चोरीला गेल्याने देवस्थानची प्रचंड आर्थिक हानी झाल्याचे दिसून येत आहे.
अनेक साधनांची चोरी
या देवस्थानातून सोन्याच्या अनेक बशा, द्वारपालकांच्या मूर्ती, तसेच दरवाजांच्या चौकटी पळविण्यात आल्या आहेत. या वस्तूंमधील काही पूर्णपणे सुवर्णाच्या, तर काही सोन्याचे पाणी दिलेल्या तांब्याच्या वस्तू आहेत. भगवान शंकरांची एक मूर्ती आणि दशराधा मूर्ती चोरीला गेली आहे. मिश्र धातूंच्या चोरीला गेलेल्या मूर्तींमधील सोने एक विशेष प्रकारचे रासायनिक द्रव्य उपयोगात आणून वेगळे करण्यात आले आणि त्याची चोरी करण्यात आली. हा प्रकार पंकज भंडारी नामक आरोपीच्या उत्पादन केंद्रात, चेन्नई येथे करण्यात आला. ही मूर्ती आजही भंडारी याच्या ताब्यात आहे. सोने गोवर्धन रो•म नामक सुवर्णकाराकडे आहे, असे अनेक आरोप विशेष अन्वेषण दलाने केले आहेत. या प्रकरणी, साबरीमला देवस्थानचे माजी कार्यकारी समिती अध्यक्ष सीपीएम पथनामथिट्टा यांना अटक करण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे...
शबरीमला सुवर्णचोरी प्रकरण 1998 मध्ये प्रथम उघड झाले होते. त्यावर्षी त्यावेळचे विख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांनी या देवस्थानाला 30.3 किलोग्रॅम सोने भेट दिले होते. तसेच त्यांनी 1 सहस्र 900 किलो तांबेही या देवस्थानला दिले होते. त्यावेळी प्रथम या मंदिराच्या व्यवस्थापनातील घोटाळे बाहेर आले आहेत.