Vinay Kore | ८० टक्के जागावाटप पूर्ण, उरलेलं मुख्यमंत्री बघतील!" : विनय कोरेंनी स्पष्ट केली महायुतीची रणनीती
गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुती सज्ज
कोल्हापूर -गोकुळ दूध संघाची निवडणूक लवकरात लवकर व्हावी असेच सरकारचे प्रयत्न आहेत. महायुतीत फार मोठा बाद नाही, जो आहे तो लवकरच संपून जाईल. महायुती म्हणून लढण्याचा आधीच ठरल्याप्रमाणे जागावाटपाचा ८० टक्के फॉर्म्युला निश्चित झाला आहे. उर्वरित २० टक्के मध्ये जी कांही ताणाताणी असेल त्यात स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालून मार्ग काढणार आहेत, अशी माहिती सोमवारी आमदार विनय कोरे यांनी कोल्हापुरात दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेल्या कोरे यांनीगोकुळ दूध संघ निवडणूक बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोकुळच्या निवडणूक घडामोडीवर भाष्य केले. ते म्हणाले, महायुतीमध्ये बाद होते, पण लवकरात लवकर जुळवून घेऊन महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचे मुख्यमंत्र्यासमोरच ठरले आहे. वेळेत निवडणुका झाल्या तर सहकार आणि सहकाराचा गाभा टिकतो याची जाणिव असल्यामुळे कोरोना काळात स्थगित झालेल्या निवडणुका कायदा बदलून पुढे वेगाने अंतिम निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडेच सर्वाधिकार घेण्याचा निर्णय झाला. यातून नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक नेमण्याची तरतूद करण्यात आली. या नवीन नियमानुसारच गोकुळवर प्रशासक नियुक्ती झाली आहे. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
गोकुळ जिंकण्यासाठी संस्था काढल्या हा मोठा गैरसमजअवसायनात काढलेल्या आणि न्यायालयीन बाब झालेल्या १३२० संस्था पैकी ७०० संस्था या २०२१ पूर्वी स्थापन झालेल्या आहेत तर ५०० संस्था या २०२१ नंतर स्थापनझाल्या आहेत. गोकुळ जिंकण्यासाठी या संस्था काढल्या हा पसरवण्यात आलेला समज खोटा आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे, हे आधी समजून घ्यायला हवे, असे आमदार कोरे यांनी स्पष्ट केले.
आमदार शिवाजी पाटील यांचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना महायुतीत घेऊ नये अशी भूमिका घेतली आहे. यावर विचारले असता आमदार कोरे यांनी हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे, त्यांचा निर्णय तेच घेतील, असे सांगितले.