भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे गोव्याचे ध्येय : मुख्यमंत्री
दिल्लीतील नीती आयोगाच्या परिषदेत केले गोव्याचे नेतृत्व
प्रतिनिधी/ पणजी
आर्थिक विकास, पर्यावरणीय सुरक्षा आणि स्थिरता, सामाजिक प्रगती आणि सुशासन याच्या जोरावर जगाला आदर्श आणि हेवा वाटावा, असे भारताला एक विकसित राष्ट्र बनविणे हे गोव्याचे ध्येय असून, त्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली येथे दिली.
नीती आयोगाच्या परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्याचे नेतृत्व करताना गोवा सरकारने विकसित भारतासाठी आखलेला रोड मॅप याविषयी भाष्य केले.
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विमान वाहतूक, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भारत आज जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 21 वे शतक आपल्या राष्ट्राचे असले पाहिजे. आज आमच्या ग्लोबल इनोव्हेशन्समध्ये राष्ट्र 40 व्या स्थानावर आहे. हवामान बदलाच्या बाबतीत भारत 7 व्या स्थानावर आहे. 2023 चा कामगिरी निर्देशांक पाहिल्यास जागतिक यादीत भारत अव्वल आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये भारताचा समावेश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे हे सर्व शक्य झाल्याचे ते म्हणाले.
‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्टअप’ यासारखी धोरणे आणि ’स्किल इंडिया’ यांनी एक परिसंस्था निर्माण केली आहे. जी नवनिर्मितीला प्रोत्साहन देते, उद्योजकतेला प्रोत्साहन देते आणि उत्पादन क्षमता वाढवते. त्यामुळेच आज भारताचा आर्थिक स्तर उंचावत असून, पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आर्थिक धोरणे देशाच्या विकासात भर घालत असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी नीती आयोगाच्या परिषदेत ठासून सांगितले.