गोवा मधुमेहाची राजधानी होऊ नये
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : मणिपाल इस्पितळात प्रसाद नेत्रालयाची सेवा
पणजी : गोवा हे आरोग्य पर्यटनाकडे वाटचाल करीत असले तरी आज बहुतांश लोकांना मधूमेहाचा त्रास जाणवत आहे. राज्यात मधुमेह ऊग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच नागरिकांनी नियमित व्यायाम, व योग्य आहाराकडे लक्ष देऊन मधूमेहाचा वाढता संभाव्य धोका टाळावा. गोवा हे देशात मधुमेहाची राजधानी होते की काय याची चिंता लागली असल्याने तसे होऊ नये, यासाठी प्रत्येकाने याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मणिपाल इस्पितळात काल रविवारपासून सुरू करण्यात आलेल्या प्रसाद नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री ड़ॉ. सावंत बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, डॉ. शेखर साळकर, डॉ. कृष्ण प्रसाद कुडलू, सुरेंद्र प्रसाद, रघुराम राव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, प्रसाद नेत्रालय यांचे गोव्यासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांनी राज्यातील काही प्रमुख तालुक्यात शिबिरे आयोजित करून विनाशुल्क मोफत सेवा दिलेली आहे. त्यांच्याकडून मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी गोव्यात प्रथमच मणिपाल इस्पितळात आपल्या नेत्ररोग उपचार तपासणी विभाग सुरू करून खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेला सुरवात केल्याचे ते म्हणाले. या कामी डॉ. कृष्ण प्रसाद कुडलू यांचे गोव्यासाठी विशेष सहाय्य लाभल्याचेही ते म्हणाले. डॉ. श्रीपाद नाईक यांनी प्रसाद नेत्रालयाची माहिती देऊन त्यांच्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. कृष्ण प्रसाद कुडलू यांनी सरकारने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मणिपाल इस्पितळात नेत्रालय सुरू केल्याचे सांगितले. तसेच गरजू ऊग्णांना अगदी कमी शुल्कात उपचार करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
40 वर्षांवरील 65 टक्के लोकांना मधूमेह
अलीकडच्या काळात गोव्यात आयोजित प्रत्येक मधुमेह शिबिरात प्रत्येक 100 व्यक्तींमागे किमान 15 ते 16 नवीन मधुमेही ऊग्ण आढळून येतात, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अलीकडील अहवालानुसार, 40 वर्षांपेक्षा जास्त लोकांपैकी जवळजवळ 65 टक्के लोक मधुमेही आहेत आणि प्रत्येक घरात जवळपास एक ऊग्ण आहे. त्यामुळे याला वेळीच हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी बदलत्या ऋतुमानानुसार आहाराकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
‘डीडीएसएसवाय’ योजनेत बदल करणार : मुख्यमंत्री
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत (डीडीएसएसवाय) थोडा बदल करून देशातील कोणत्याही राज्यात आरोग्यसेवेचा लाभ डीडीएसएसवाय योजनेअंतर्गत व्हावा यासाठी सरकार आग्रही आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.