इंदौर विमानतळावर गोव्याचे प्रवासी अडकले
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांनंतर रात्री मिळाले विमान : खासदार तानावडे यांनीही केली विमान प्राधिकरणाकडे विचारणा
पणजी : इंदौर-गोवा या मार्गावरील इंदौरहून दुपारी 12.20 मिनिटांनी सुटणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गोव्याच्या प्रवाशांना तसेच अन्य प्रवाशांनाही विमानतळावर तासनतास ताटकळत रहावे लागले. एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान काल रविवारी दुपारी 12.20 वाजता इंदौरहून गोव्यासाठी उड्डाण करणार होते. परंतु त्यापूर्वीच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा, असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला. निर्धारित वेळेत हे विमान उड्डाण करू शकले नाही. याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना प्रवाशांना न दिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही वेळ गेल्यानंतर प्रवाशांकडून विचारणा करण्यात आल्यानंतर हा प्रकार त्यांना समजला. त्यानंतर बऱ्याचवेळाने प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आले. रात्री नऊवाजेपर्यंत प्रवाशांना तेथेच ताटकळत रहावे लागले.
यादरम्यान विमान प्राधिकरणाकडून प्रवाशांना 1 पाण्याची बाटली आणि स्लाईस ब्रेड पुरविण्यात आले. दुसऱ्या विमानाची सोय लगेच करण्याची काळजी इंदौर विमान प्राधिकरणाने न घेतल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या विमानात 181 प्रवासी होते. त्यातील बहुतांश प्रवासी हे गोव्याला पर्यटनासाठी येत होते. यामध्ये गोव्यातील स्थानिक प्रवाशांचाही समावेश होता. याबाबतची कल्पना येताच राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विमान प्राधिकरणाकडे चर्चा करून प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल विचारणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली येथील एअर इंडियाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. रात्री नऊ वाजल्यानंतर दुसरे विमान आले. विमानाची व्यवस्था केल्याबद्दल प्रवाशांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार सदानंद तानावडे यांचे आभार व्यक्त केले.