केंद्रीय अर्थसंकल्पाचा गोव्याला विशेष लाभ नाही
नारळ, काजू उत्पादन वाढीसाठी विशेष योजना
पणजी : गोवा राज्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून विशेष असा कोणताही लाभ मिळाला नसल्याचे समोर आले आहे. गोवा राज्यासाठी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात नाही. तथापि किनारी भागातील नारळ, काजू उत्पादन वाढण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार असून त्याचा फायदा मात्र गोव्याला होऊ शकतो असे दिसून आले आहे. राज्यात तिसरा कुशावती जिल्हा स्थापन करण्यात आला असून त्याकरिता रु. 500 कोटीचे अर्थसाहाय्य द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. त्या मागणीची फारशी दखल घेण्यात आलेली नाही, असे दिसून आले आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी घेतलेल्या विविध राज्यांच्या बैठकीत डॉ. सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सदर मागणी केली होती. पर्यटन, साधन - सुविधा आणि इतर विकासकामे कुशावती जिह्यासाठी करणे आवश्यक असून त्यासाठी हा निधी मागण्यात आला होता. तो मिळाला नसल्यामुळे गोवा सरकारची तशी निराशाच झाली आहे. सत्ताधारी पक्ष तसेच उद्योग क्षेत्रातील मंडळी अर्थसंकल्पाचे स्वागत करीत असून विरोधी पक्ष, आमदार मात्र त्यावर टीका-टिप्पणी करीत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य जनतेला मात्र अर्थसंकल्पाचे विशेष ज्ञान नसते आणि त्याचे फारसे देणे - घेणेही नसते, असे दिसून येते.