कहाण्यांना देते प्राधान्य : राशी खन्ना
‘120 बहादुर’ या चित्रपटातील अभिनयाद्वारे राशी खन्नाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. राशी खन्नाने स्वत:च्या कारकीर्दीविषयी मत व्यक्त केले आहे. कलाकार म्हणून विकसित होतेय आणि ही प्रक्रिया प्रत्येक चित्रपटासोबत चालत राहते. मी वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक व्यक्तिरेखेद्वारे काही ना काही शिकता येते, असे राशीने म्हटले आहे.
कमर्शियल चित्रपट करणे मला पसंत आहे, दाक्षिणात्य चित्रपटांमुळे माझ्या कारकीर्दीला मोठा हातभार लागला. तर ‘फर्जी’ या वेबसीरिजमुळे मला लोकांनी गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. माझ्यासाठी माध्यमापेक्षा कहाणी महत्त्वाची आहे. याचमुळे मी ‘120 बहादुर’ आणि ‘साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटांमध्ये काम करण्यास होकार दिला होता, असे राशीने म्हटले आहे.
‘फर्जी 2’ मध्ये माझी व्यक्तिरेखा कुठल्या दिशेला जाईल हे सध्यातरी मला माहिती नाही. परंतु स्वत:ची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी फर्जी सीरिज मला पुन्हा पहावी लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस आम्ही याचे चित्रिकरण सुरू करणार आहोत, असे राशीने सांगितले आहे. राशी आगामी काळात ‘तलाकों में एक’ या चित्रपटात दिसून येणार असून यात ती एका बंगाली युवतीची भूमिका साकारत आहे.