For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुते मागतात ‘मठ्ठा’

06:38 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
भुते मागतात ‘मठ्ठा’
Advertisement

काही ऐतिहासिक वास्तूंसंबंधी अनेक प्रकारचे समज समाजात पसरलेले असतात, हे सर्वांना ज्ञात आहे. कित्येक समजांची चर्चा पिढ्यानपिढ्या होत आलेली आहे. राजस्थानातील छतरपूर जिल्ह्याच्या महाराजपूर विभागातील एका लहान गावात 700 वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेला एक राजवाडा आजही उभा आहे. एकेकाळी ही वास्तू या गावातील सर्वात मोठी होती. तिला ‘बडी बखरी’ असे नामोनिधान होते. आज ही वास्तू ‘भूत बंगला’ या नावाने प्रसिद्ध आहे.

Advertisement

गावातील लोकांची अशी समजूत आहे, की या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास आहे. या वास्तूत वास्तव्य करणाऱ्यांना संतती होत नाही. त्यांच्या संबंधात काहीना काही अपशकून घडतात, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सुस्थितीत असूनही ही वास्तू ओस पडलेली आहे. रात्रीच्या वेळी दारुडे किंवा जुगारीही या वास्तूत जात नाहीत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकदा काही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी या वास्तूत शिरले होते. तथापि, त्यांना असे अनुभव आले, की त्यांनी घाबरुन त्वरित पळ काढला.

या वास्तूत अनेक हत्या झाल्या आहेत, अशीही चर्चा आहे. त्यांचे मृतदेह याच वास्तूच्या अंगणात दफन करण्यात आले आहेत. हत्या झालेल्या लोकांचे अतृप्त आत्मे या वास्तूत भुतांच्या रुपात फिरत असतात. येथे कोणी वास्तव्यास आला तर ही भुते त्याच्याकडे मठ्ठा मागतात, अशीही चर्चा आहे. अंगणात मोठ्या प्रमाणात धन पुरुन ठेवण्यात आले आहे, अशीही वदंता आहे. धनाच्या मोहापायी अनेक लोकांनी येथे येऊन खोदकाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, त्यांनाही असे अनुभव आले आहेत, की खोदकाम सोडून त्यांना जावे लागले आहे. त्यामुळे कोणीच येथे येण्यास धजावत नाहीत. या वास्तूच्या दर्शनी भिंतीवर ‘भुतांपासून सावधान’ असा एक फलकही लिहून ठेवण्यात आला आहे. काही जणांच्या मते हा सारा कल्पनेचा खेळ आहे. कारण भुते वगैरे काही नसतेच. तथापि, कोणचाही मत काहीही असले, तरी येथे कोणीही येण्यास धजावत नाही, हे ही तितकेच खरे आहे. ही वास्तू तिच्या या अद्‘भूत’ वैशिष्ट्यांमुळे आसपासच्या भागांमध्ये बरीच प्रसिद्ध असून तिला पाहण्यासाठी पुष्कळ लोक गावात येतात. पण दूरुनच पाहून समाधान मानतात. सत्य शोधण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीत, हेच सत्य आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.