‘वेटिंग’ तिकीटच्या समस्येपासून मिळणार मुक्ती
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा : सर्व प्रवाशांना मिळणार कम्फर्म तिकीट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अनेकांना कम्फर्म तिकीट न मिळाल्याने त्रास होत असतो. याची तक्रार अनेकदा लोक सोशल मीडियावरून करत असतात. खूप आधी बुकिंग करूनही अनेकांचे तिकीट वेटिंगमध्येच राहते. परंतु आता सरकार ही समस्या दूर करण्याच्या दिशेने काम करत आहे.
पुढील 5 वर्षांमध्ये जवळपास सर्व प्रवाशांना कम्फर्म तिकीट मिळू लागेल. रेल्वे प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना कम्फर्म तिकीट मिळावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
नव्या रेल्वेमार्गांची जलद निर्मिती
पुढील 5 वर्षांमध्ये रेल्वेची क्षमता इतकी वाढविली जाईल की रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना सहजपणे कम्फर्म तिकीट मिळू शकेल. मागील एक दशकादरम्यान रेल्वेच्या विकासाचा वेग खूपच अधिक राहिला आहे. 2004-14 दरम्यान केवळ 17 हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात आले हेते. तर 2014-24 पर्यंत 31 हजार किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग निर्माण करण्यात आले आहेत. 2004-14 या कालावधीत जवळपास 5 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले होते. मागील 10 वर्षांमध्ये 44 हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. 2004-14 या कालावधीत केवळ 32 हजार रेल्वेडबे तयार करण्यात आले. मागील 10 वर्षांमध्ये 54 हजार रेल्वेडबे निर्माण करण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
2026 मध्ये धावणार बुलेट ट्रेन
देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी विविध स्थानकांच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. 2026 मध्ये एका हिश्श्यात पहिली बुलेट ट्रेन धावू लागणार आहे. अहमदाबाद-मुंबई मार्गावर बुलेट ट्रेनचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. याकरिता 290 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या मार्गाचे काम यापूर्वीच करण्यात आले आहे. या हिश्श्यात 8 नद्यांवर पूल उभारण्यात आले आहेत. 12 स्थानकांचे काम सुरू आहे. अनेक स्थानकांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. 2026 मध्ये बुलेट ट्रेन संचलनासाठी काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा वैष्णव यांनी केला आहे.