शौर्य चौक मार्गावर कचऱ्याची समस्या
उचल करण्याकडे दुर्लक्ष : सौंदर्याला बाधा
बेळगाव : बेळगाव-राकसकोप मार्गावरील शौर्य चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा पडून असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास होऊ लागला आहे. एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत शहर स्वच्छ, सुंदर बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मात्र कचरा समस्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. शहराच्या विस्तारात वाढ झाल्याने कचराही वाढू लागला आहे. मनपा हद्दीत सुका आणि ओला कचरा स्वतंत्र संकलित केला जात आहे. तर कॅन्टोन्मेंट हद्दीत कचऱ्याचा प्रश्न कायम आहे. कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: दुर्गंधीलाही सामोरे जावे लागत आहे. वळीव पावसामुळे चिखल आणि आता कचऱ्याची दुर्गंधी निर्माण होऊ लागली आहे. कॅम्प परिसरात रस्ते आणि निसर्गरम्य झाडे आहेत. मात्र, या ठिकाणीच कचरा साचून असल्याने या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मनपा आणि कॅन्टोन्मेंट सीमाहद्दीवर कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष होत आहे. कचरा मनपाने की कॅन्टोन्मेंटने उचलावा या गोंधळात कचरा पडून असल्याचेही दिसत आहे. या परिसरातील कचऱ्याची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.