भाग्यनगर येथील भंगीबोळांची दुरवस्था
महानगरपालिकेने तातडीने साफसफाई करण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : भाग्यनगर परिसरात असलेल्या भंगीबोळामध्ये कचऱ्याचे ढीग साचून आहेत. याचबरोबर त्या भंगीबोळांमध्ये माती तसेच इतर साहित्य फेकून देण्यात आले आहे. त्यामुळे त्या भंगीबोळातून ये-जा करणे तसेच साफसफाई करणे अशक्य झाले असून महानगरपालिकेने ती भंगीबोळे स्वच्छ करावीत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. भंगीबोळामध्येच कचरा फेकून देण्यात येत आहे. झाडाच्या फांद्या तसेच इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहे. त्यामुळे भंगीबोळ पूर्णपणे बंद झाले आहे. याचबरोबर भंगीबोळामध्ये झाडेझुडपे वाढली असून काही जणांनी त्या ठिकाणी अतिक्रमणही केले आहे. तेव्हा महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देवून तेथील स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. भाग्यनगर परिसरात वारंवार अशा प्रकारे भंगीबोळांच्या अस्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. मनपाच्या साफ दुर्लक्षामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. तेव्हा तातडीने या परिसरातील भंगीबोळांची सफाई करावी, अशी मागणी होत आहे.