गणपत गल्ली चौकात कचऱ्याचा ढीग
महानगरपालिका लक्ष देणार का?: कचऱ्याची वेळेत उचल करण्याची मागणी
बेळगाव : शहरातील कचऱ्याची दोनवेळा उचल केली जात होती. मात्र आता सध्या एकदाच कचऱ्याची उचल केली जात आहे. त्यामुळे गणपत गल्ली येथे मोठा कचऱ्याचा ढीग दररोज साचून राहत आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तेव्हा त्या कचऱ्याची तातडीने उचल करा, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांतून होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये तत्कालीन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दोनवेळा कचरा उचलण्याची मोहीम राबविली होती. पहाटे तसेच रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घंटागाडी फिरत होती. व्यावसायिक त्या वाहनांमध्ये कचरा देत होते. त्यामुळे चौकांमध्ये टाकण्यात येणारा कचरा थांबला होता. याचबरोबर ब्लॅकस्पॉटही कमी झाले होते. मात्र रात्रीच्यावेळी कचरा उचलण्याचे थांबल्यामुळे पुन्हा कचऱ्याचे ढीग साचून राहत आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
खराब भाजी टाकण्याच्या प्रकारात वाढ
गणपत गल्ली, रविवारपेठ, मारुती गल्ली या परिसरात भाजी विक्रेत्यांसह फळ विक्रेतेही मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत असतात. संध्याकाळी जाताना शिल्लक राहिलेली तसेच खराब झालेली भाजी तेथेच टाकून ते जात आहेत. त्यामुळे कचऱ्याचा ढीग पडू लागला आहे. याचबरोबर काही व्यावसायिकही दुकानातील टाकावू कचरा त्याठिकाणी फेकत आहेत. त्यामुळे मोठा ढीग तयार होत आहे. तेव्हा तातडीने या कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी होत आहे.