For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवडी बाजारात मोबाईल चोरणारी टोळी गजाआड

12:52 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठवडी बाजारात मोबाईल चोरणारी टोळी गजाआड
Advertisement

भद्रावती-हुबळी येथील आठ जणांना अटक : कटकोळ पोलिसांची कारवाई : 40 मोबाईलसह 2 कार जप्त

Advertisement

बेळगाव : वेगवेगळ्या गावात होणाऱ्या बाजारात मोबाईल चोरणाऱ्या आठ जणांच्या टोळीला कटकोळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 4 लाख 94 हजार 200 रुपये किमतीचे 40 मोबाईल व चोरीसाठी वापरण्यात आलेल्या दोन कार, असा एकूण 10 लाख 34 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी 7 जण शिमोगा जिल्ह्यातील भद्रावतीचे आहेत. तर एकजण हुबळी येथील राहणारा आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक चिदंबर मडिवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर, कटकोळचे उपनिरीक्षक बसवराज कोन्नुरे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अन्नपूर्णा यल्ल, बी. व्ही. हुलकुंद, एस एस. वज्रमट्टी, एम. सी. मण्णिकेरी, एस. एम. बसरीकट्टी, आर. बी. गोकाक, डी. एच. नदाफ, बी. एस. चुंचनूर, बी. एच. पाटील, एम. एम. द्यामणगौडर, एम. जी. हिरूर, जे. आर. गिड्डप्पण्णवर, के. टी. चव्हाण आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.

विकास व्यंकटेश भोवी, कुमार बापण्णा भोवी, प्रवीण मंजाप्पा भोवी, संतोष गवीस्वामी कुंडा, शिवू यल्लाप्पा भोवी, व्यंकटेश इराप्पा भोवी, अक्षय गणेश ए. जी. (सर्व रा. भद्रावती, जि. शिमोगा), सचिन लक्ष्मण कल्लवड्डर (रा. गोकुळ रोड हुबळी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याजवळून विविध कंपन्यांचे 40 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 23 मे रोजी सालहळ्ळी (ता. रामदुर्ग) येथील बाजारपेठेत निलप्पा सन्नतम्माप्पा सक्री (रा. बिजगुप्पी, ता. रामदुर्ग) या सहशिक्षकाच्या खिशातून विवो कंपनीचा मोबाईल चोरला होता. दुसऱ्या दिवशी 24 मे रोजी दुपारी कटकोळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता. मोबाईल चोरीचा तपास करताना 8 जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्याजवळून वेगवेगळ्या गावांतील बाजारात चोरलेले 40 मोबाईल संच जप्त करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार दोन कारमधून ते भद्रावती व हुबळीतून बाहेर पडतात. कोणत्या गावचा आठवडी बाजार कोणत्या दिवशी आहे याची माहिती त्यांनी आधीच मिळविलेली असते. गावाजवळ कार उभी करून आठवडी बाजारात फिरून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील, पर्समधील मोबाईल पळवितात. एका गावात अर्धा तासपर्यंत त्यांचा वावर असतो. त्यानंतर ते दुसऱ्या गावाला जातात.

Advertisement

मुक्कामासाठी यल्लम्मा डोंगरावर

बाजाराच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरण्यात या टोळीतील गुन्हेगारांचा हातखंडा आहे.रामदुर्ग तालुक्यातील विविध गावांतून मोबाईल चोरल्यानंतर मुक्कामासाठी ते सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा डोंगरावर दाखल होत होते. 23 मे रोजी सालहळ्ळी येथे बाजारात झालेल्या मोबाईल चोरीचा माग काढताना कटकोळ पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. या टोळीकडून आणखी 20 हून अधिक मोबाईल जप्त होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.