मनपाची ब्लॅकस्पॉट निर्मूलनासाठी ‘गांधीगिरी’
जुन्या महात्मा फुले रोडवरील ब्लॅकस्पॉट हटविला : नागरिकांतून समाधान : शहर-उपनगरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न करणार
बेळगाव : शहर व उपनगरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत, त्याठिकाणी कचरा टाकू नये, टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा फलक लावूनदेखील बहुतांश ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी आता कुंड्या ठेवण्यासह फुलांची सजावट करून नागरिकांमध्ये गांधीगिरीच्या माध्यमातून जागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. गुरुवारी जुन्या महात्मा फुले रोडवरील ब्लॅकस्पॉटवर अशा प्रकारचा प्रयोग राबविण्यात आला आहे.
स्वच्छ व सुंदर बेळगाव व्हावे यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण भागात कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी भूमिगत कंटेनर बसविण्यात आले आहेत. मात्र कचरा टाकणारे नागरिक कंटेनरमध्ये कचरा टाकण्याऐवजी वाहनावरून जाता जाता कचरा प्लास्टिक पिशवीत बांधून फेकून देत आहेत. त्यामुळे कचरा डस्टबिनमध्ये पडण्याऐवजी बाहेर पडत असल्याने ठिकठिकाणी गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ नागरिकांना आली आहे.
घंटागाडीचीही काही प्रभागात समस्या
घरातील कचरा घंटागाडीकडे देणे गरजेचे आहे. पण अद्यापही बहुतांश जण कचऱ्याचे वर्गीकरण न करता जागा मिळेल त्या ठिकाणी टाकून देत आहेत. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत. इतके करूनही उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या मात्र घटलेली नाही. त्यामुळे पर्यावरण विभागावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यापूर्वी हटविण्यात आलेले ब्लॅकस्पॉट पुन्हा तयार झाल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. कचऱ्याची वेळेत उचल होत नाही. तसेच घंटागाडीचीही काही प्रभागात समस्या आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून जुन्या महात्मा फुले रोडवर रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. त्यामुळे सदर ब्लॅकस्पॉट हटविण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. याची दखल घेत महापालिकेचे साहाय्यक पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांनी जुन्या महात्मा फुले रोडवरील ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी कुंड्या ठेवण्याबरोबरच फुले ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांवर गांधीगिरीच्या माध्यमातून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न मनपाकडून करण्यात आला आहे. सध्या केवळ जुन्या महात्मा फुले रोडवर अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला असला तरी भविष्यात शहर व उपनगरात इतर ठिकाणीदेखील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनगोळ येथे नोटीस फलकाखालीच कचरा
एकीकडे महापालिकेकडून ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असले तरी नागरिकांमध्ये शिस्त निर्माण झाली नसल्याचे दिसून येत आहे. कचरा टाकू नये, टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा आशयाचे फलक लावलेल्या ठिकाणीच नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. अनगोळ हनमण्णावर गल्लीच्या कोपऱ्यावर फलकाच्या खालीच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्याठिकाणी महापालिकेच्यावतीने कारवाई होणे गरजेचे आहे.