ZP Election 2025: गडहिंग्लजमध्ये NCP विरोधात लढत? मुश्रीफांचं वजन कुणाच्या पारड्यात पडणार?
दोन्ही मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचीच ताकद अधिक
By : जगदीश पाटील
गडहिंग्लज : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहेत. गडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ तर पंचायत समितीचे १० जण कार्यरत आहेत. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी हालचाली चालवल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाची चंदगड आणि कागल या दोन विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे.
या दोन्ही मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचीच ताकद अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधी असेच राजकीय समीकरण राहणार असल्याचे स्पष्ट आहे. गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. तर नेसरी, भडगाव, हलकर्णी, नूल हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघात येतात.
कागल विधानसभेचे नेतृत्व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ करत असल्याने कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राज्याप्रमाणे सत्तारुढ गटाची राष्ट्रवादी, भाजपा, शिंदे शिवसेना अशी महायुती झाली तरी येथील उमेदवारी ठरवताना मंत्री मुश्रीफ यांचाच वरचष्मा राहणार आहे. त्यामुळे या विरोधात महाविकास आघाडी अथवा अन्य आघाडीकडून कोण उमेदवार असणार? याची चर्चा रंगली आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी कडगाव मतदारसंघात कायम वरचष्मा ठेवल्याने यावेळी मुश्रीफ यांचे वजन कोणत्या उमेदवारासाठी खर्ची होणार? याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार कोण? याकडे सर्वांचे लक्ष आहे. चंदगड मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या ४ जिल्हा परिषद आणि ८ पंचायत समितीच्या जागांसाठी माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला झुंजावे लागणार आहे.
राज्याप्रमाणे येथे महायुती कार्यरत झाली तरी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व राहणार आहे. याशिवाय विधानसभेच्या शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदा बाभुळकर यांचे लक्षही या मतदारसंघावर राहणार आहे. त्यामुळे या ४ जिल्हा परिषद मतदारसंघात आघाड्या कशा होणार? हाच सध्या औत्सुक्याचा विषय आहे. राष्ट्रवादीप्रमाणे भाजपा यांचीही अलिकडे या भागात ताकद वाढताना दिसत आहे.
याशिवाय काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना यांनाही दुर्लक्षून चालणार नाही. पण प्रामुख्याने उमेदवारीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातच चुरस राहणार आहे. राज्याप्रमाणे महायुती आकाराला आली तर? या प्रश्नाची चर्चा होत असून आमदार शिवाजीराव पाटील यांना आपल्या ताकदीसाठी पुन्हा एकदा येथे संघर्ष करावा लागणार आहे.
विधानसभेच्या पराभवाचे शल्य बाजूला ठेवत माजी आमदार राजेश पाटील यांना येथे काम करावे लागणार आहे. त्यामुळे या ४ जिल्हा परिषद मतदारसंघात होणाऱ्या लढती अधिक अटीतटीच्या होतील, असे संकेत आतापासूनच मिळत आहेत