जिल्ह्यात आजपासून ‘नवरात्रोत्सवा’चा जागर!
रत्नागिरी :
जिह्यात आज सोमवार 22 सप्टेंबर घटस्थापनेपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाचा जागर रंगणार आहे. जिह्यात 436 सार्वजनिक तर 65 खासगी अशा एकूण 501 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. तर 424 सार्वजनिक आणि 19,315 खासगी ठिकाणी घटस्थापना आणि प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. आजपासून नऊ दिवस दांडिया आणि गरब्याची ‘धूम’ सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना केली जात आहे. या उत्सवाच्याठिकाणी दांडियाचे कार्यक्रम करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून वाढीस लागली आहे. काही भागांमध्ये ग्रामदेवतांच्या मंदिरासमोरच हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शहरांमध्ये तर गल्लोगल्ली व काही भागांमध्ये उत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे.
घटस्थापनेनिमित्त देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन होणार आहे. रत्नागिरी शहरातही मागील काही वर्षात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नवरात्र उत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवाची वर्षागणिक वाढलेली रंगत आणि दांडिया स्पर्धांमध्ये विशेष करून युवा पिढीचा सहभाग लक्षात घेत राजकीय मंडळीही या उत्सव मंडळांना आर्थिक मदत करण्यात पुढे सरसावली आहेत.
जिह्यात नवरात्रीची आतूरता लागली आहे. नवरात्रनिमित्त शहरासह जिह्यातील बाजारपेठाही सजू लागल्या आहेत. दुर्गामातेची आरास करण्यासाठी लागणारे विविध साहित्य, नऊ रंगाच्या साड्या, गरबा, दांडियांसाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे. 2 ऑक्टोबरला विजयादशमीनंतर नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
- भक्तांमध्ये पसरला उत्साह
यावर्षी घटस्थापनेपासून अकराव्या दिवशी दसरा आहे. यानिमित्त ग्रामीण भागातील विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे मंडळांकडून दांडिया-गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे. उत्सव मंडळे सज्ज झाली आहेत.