For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

15 जूनपासून एक्स्प्रेस धावणार विद्युत इंजिनवर

11:17 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
15 जूनपासून एक्स्प्रेस धावणार विद्युत इंजिनवर
Advertisement

लेंढा-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण-विद्युतीकरण पूर्ण

Advertisement

बेळगाव : लोंढा-मिरज या 186 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 7 टप्प्यात मागील पाच वर्षांपासून विद्युतीकरण व दुपदरीकरण करण्यात आले. यामुळे मिरज रेल्वेस्थानकातून कर्नाटक, तसेच गोवा येथे जाणाऱ्या एक्स्प्रेस आता विजेवर धावणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील कुडची-मिरज रेल्वेमार्ग 15 जूनपासून विजेवरील एक्स्प्रेससाठी खुला केला जाणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या लोंढा-मिरज रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला डिसेंबर 2019 पासून सुरुवात झाली. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळाली. एकूण 7 टप्प्यांमध्ये काम पूर्ण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात चिकोडी ते घटप्रभा या 16 कि.मी. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. याचदरम्यान कोरोनाची लाट आल्याने मध्यंतरी दुपदरीकरणाच्या कामाला ब्रेक लागला होता.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात चिकोडी-रायबाग-चिंचली अशा 31 कि.मी. व बेळगाव-खानापूर 25 कि.मी. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर चौथ्या टप्प्यात लोंढा-खानापूर 25 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. पाचव्या टप्प्यात बेळगाव ते सुलधाळ, सहाव्या टप्प्यात सुलधाळ ते घटप्रभाचे काम पूर्ण झाले. सातव्या-शेवटच्या टप्प्यात कुडची-मिरज या 33 कि. मी. रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात होते. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने दोन दिवसांपूर्वी एक प्रसिद्धी पत्रक काढून कुडची-मिरज रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने 15 जूनपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावरील एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार आहेत. यापूर्वी बेंगळूरहून उत्तर भारतात जाणाऱ्या एक्स्प्रेस बेळगावपर्यंत विद्युत इंजिनावर धावत होत्या. यापुढे मिरजपर्यंत इंजिन बदलण्याची वेळ येणार नाही.

Advertisement

या एक्स्प्रेस रेल्वेंचा मार्ग मोकळा

विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने 15 जूननंतर कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस, मिरज-बेंगळूर राणी चन्नम्मा एक्स्प्रेस, अजमेर-जोधपूर गांधी धाम एक्स्प्रेस यासह इतर एक्स्प्रेस यापुढे विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवास जलद होणार असून प्रवाशांची सोय होणार आहे. अद्याप मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम अपुरे असल्याने पुढील प्रवासाला वेळ लागण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.