For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘चांदा ते बांदा नव्या वळणावर

06:00 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘चांदा ते बांदा नव्या वळणावर
Advertisement

एका बाजूला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश उष्णतेने होरपळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात प्री-मान्सून पावसाचा अनियमित मारा सुरू आहे. ही विसंगतीच खरी भीतीदायक आहे.

Advertisement

उत्तर भारतात उष्णतेने अक्षरश: कहर माजवला आहे. पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ते विदर्भापर्यंत भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा गंभीर इशारा दिला आहे. काही भागांत तापमान 45 अंशांच्या पुढे गेले असून ‘वॉर्म नाईट्स‘ म्हणजे रात्रीही न उतरणारे तापमान ही नव्या संकटाची घंटा ठरत आहे. परंतु महाराष्ट्राची अवस्था केवळ ‘गरम‘ एवढ्यावर थांबलेली नाही. राज्य दोन टोकांच्या हवामानात अडकले आहे. एका बाजूला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश उष्णतेने होरपळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात

प्री-मान्सून पावसाचा अनियमित मारा सुरू आहे. ही विसंगतीच खरी भीतीदायक आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकाचा पट्टा सध्या ‘ढगाळ-उकाडा-पाऊस‘ या त्रिसूत्रीमध्ये अडकला आहे. दिवस उकाड्याचे, संध्याकाळी ढगफुटीच्या सरी आणि रात्री दमट वातावरण. यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिक सर्वच संभ्रमात आहेत. ऊस, द्राक्षे, आंबा, काजू आणि भात या पिकांवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. कोकणात आंबा हंगामावर अवेळी पावसाचा परिणाम झाला, तर पश्चिम महाराष्ट्रात पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई वाढण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात समुद्री आर्द्रता वाढली आहे. गोवा आणि किनारी कर्नाटकात विजांसह पावसाचे प्रमाण वाढत आहे. हवामान विभागाने किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज दिला आहे. याचा अर्थ मान्सूनची चाहूल जवळ आली असली, तरी त्याचा स्वभाव अस्थिर असणार हे स्पष्ट आहे. मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. आर्थिक राजधानीत तापमानापेक्षा ‘ह्यूमिड हीट‘ म्हणजे दमट उष्णता अधिक त्रासदायक बनत आहे. लोकल प्रवास, झोपडपट्ट्यांतील राहणीमान आणि विजेवरील वाढता ताण हे मुंबईसमोरील मोठे प्रश्न ठरत आहेत. नागपूर आणि वर्धा भागात मात्र उन्हाचा चटका अधिक तीव्र आहे. विदर्भात उष्णतेची लाट सलग टिकून राहिल्याने शेतमजूर, बांधकाम कामगार आणि वृद्ध नागरिक सर्वाधिक धोक्यात आले आहेत. नाशिक, अहिल्यानगर आणि संभाजीनगर या भागांत दुपारचे तापमान वाढते आहे; पण त्याच वेळी अचानक ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह सरी पडत आहेत. ही परिस्थिती शेतीसाठी धोक्याची आहे. कांदा, द्राक्षे आणि भाजीपाला साठवणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बुलढाणा, अकोला आणि अमरावती भागात पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर होत चालला आहे. दक्षिण महाराष्ट्रात आणखी एक वेगळी समस्या आहे  हवामानातील अस्थिरता. सांगली-साताऱ्यात

Advertisement

एप्रिल-मे महिन्यात ज्या प्रकारचे तापमान अपेक्षित असते, त्याऐवजी सतत बदलणारे वातावरण दिसते आहे. डेंग्यू, उष्माघात, त्वचारोग आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढू शकतात. यंदाचा उन्हाळा केवळ ‘तापमान‘ म्हणून समजण्याची चूक आपण करू नये. हा हवामान बदलाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. उष्णता, दमटपणा, अनियमित पाऊस, वाढती वीज मागणी, पाण्याचा ताण आणि शेतीतील अनिश्चितता या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. हवामान विभागाचे इशारे आता फक्त ‘बातमी‘ राहिलेले नाहीत. ते आर्थिक आणि सामाजिक इशारे बनले आहेत. आज महाराष्ट्र ‘दुष्काळ की महापूर‘ या जुन्या द्वंद्वातून बाहेर पडून ‘अस्थिर हवामान‘ या नव्या वास्तवात प्रवेश करत आहे. चांदा ते बांदा राज्याचा प्रत्येक कोपरा या बदलाचा अनुभव घेत आहे. ग्रामीण भागात पाणी आणि शेतीचा प्रश्न आहे, शहरांत उष्णता आणि आरोग्याचा. त्यामुळे आता फक्त पावसाची वाट पाहून भागणार नाही. जलसंधारण, शहरी नियोजन, उष्णता कृती आराखडे, स्थानिक हवामान व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक विकास ही तातडीची राष्ट्रीय गरज बनली आहे. कारण हा उन्हाळा फक्त ऋतू नाही; तो भविष्यातील भारताचा आरसा आहे.

Advertisement
Tags :

.