पाच वर्षे मोफत रेशन देण्यावर शिक्कामोर्तब
गरिबांना लाभ : महिलांना ड्रोन प्रशिक्षण मिळणार : मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ही योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. याशिवाय ड्रोन सखी योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे.
ड्रोन सखी योजनेलाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ड्रोन उडवणाऱ्या महिलेला दरमहा 15 हजार ऊपये मानधन आणि तिच्या सहाय्यकाला 10 हजार ऊपये मानधन दिले जाणार आहे. ही योजना 2026 पर्यंत सुरू राहणार असून एकूण 1,261 कोटी ऊपये खर्च होणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 व्या वित्त आयोगासाठी टर्म ऑफ रेफरन्सला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सध्याच्या आयोगाचा कार्यकाळ मार्च 2026 पर्यंत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत, मंत्रिमंडळाने बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत जलदगती विशेष न्यायालय 2026 पर्यंत सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना 1 जानेवारी 2024 नंतर पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 4 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी या निर्णयाचे संकेत दिले होते. या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत धान्य मिळणार असून 81 कोटी भारतीयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर सरकार पुढील पाच वर्षांत 11.80 लाख कोटी ऊपये खर्च करणार आहे.
उत्तराखंड बचावकार्यावरही चर्चा
उत्तरकाशी टनेल रेस्क्मयू ऑपरेशनचा उल्लेख मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. या यशस्वी मोहिमेबाबत बैठकीत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधानांसह मंत्रिगण भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडून फोनवर बचावकार्याशी संबंधित अपडेट घेत होते. निवडणूक प्रचार आणि अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असूनही पंतप्रधान सतत अपडेट्स घेत होते. बोगद्यातून बाहेर पडलेल्या 41 कामगारांशी पंतप्रधान मोदींनी फोनवर संवाद साधला आणि कामगारांच्या शौर्याचे कौतुकही केले.