बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही मोफत बसप्रवास?
बेळगाव : राज्यात बालस्नेही वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची सुविधा देण्याची योजना आखली आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार ही योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार प्रस्तावाचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याची सूचना परिवहन मंडळांना दिली आहे. टप्प्याटप्प्याने ही योजना राज्यभरात लागू करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात बेंगळूरच्या आसपास जिल्ह्यांमध्ये होणार आहे.
त्यानंतर याचा राज्यात विस्तार केला जाणार आहे. या उपक्रमाला गती देण्यासाठी अतिरिक्त बसेस खरेदी करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे समजते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागांमध्ये शाळा व महाविद्यालयांसाठी विशेष बससेवा सुरू केली जाणार आहे. शाळांच्या वेळेनुसार सकाळी व सायंकाळी गर्दीवेळी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. सर्व बसेस सीसीटीव्ही पॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली व आपत्कालीन पॅनिक बटण याने सुसज्ज केल्या जाणार आहेत. प्रत्येक बसवर बालसाहाय्य हेल्पलाईन क्रमांक 1098 प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. बससेवेच्या मार्गाचे पालन व वेळेचे व्यवस्थापन यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.