उत्तराखंड हिमस्खलनात चौघांचा मृत्यू
चमोलीमधील बचावकार्यात 50 कामगारांना वाचवले : पाच कामगार अजूनही बेपत्ता
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील चमोली हिमस्खलनात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी 17 कामगारांना वाचवण्यात आले. यापूर्वी शुक्रवारी याआधी 33 जणांना वाचवण्यात आले होते. वाचवलेल्यांपैकी गंभीर जखमी झालेल्या चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 5 कामगार अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाची दुर्घटना शुक्रवार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता चमोली येथील माना गावाजवळ घडली हाती. मोली-बद्रीनाथ महामार्गावरील एका कंटेनर हाऊसमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) चे 55 कामगार वास्तव्यास असताना बर्फाचा डोंगर कोसळला. या हिमस्खलनात सर्व कामगार अडकले होते. या दुर्घटनेत बचावकार्यासाठी 4 आर्मी हेलिकॉप्टर व्यतिरिक्त, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे 200 हून अधिक सैनिक गुंतले आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यापासून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ज्या कामगारांची प्रकृती गंभीर होती त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जोशीमठ येथील रुग्णालयात 25 हून अधिक जखमींना दाखल करण्यात आले असल्याचे आयटीबीपी कमांडंट विजय कुमार पी यांनी सांगितले.
अडकलेले बहुतेक कामगार बिहार, उत्तर प्रदेशातील
अडकलेल्या 55 कामगारांमध्ये बिहारमधील 11, उत्तर प्रदेशातील 11, उत्तराखंडमधील 11, हिमाचल प्रदेशातील 7, जम्मू काश्मीरमधील 1 आणि पंजाबमधील एका कामगाराचा समावेश आहे. 13 कामगारांचा पत्ता आणि मोबाईल नंबर उपलब्ध नाही.
पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. तसेच इस्पितळांमध्ये उपचार घेत असलेल्या कामगारांचीही भेट घेतली. याचदरम्यान पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत बचावकार्याचा आढावा घेतला.