कार-ट्रक अपघातात चार जण ठार
विजापूर जिल्ह्यातील अर्जुनगीनजीकची घटना : तीन जण जखमी : बबलेश्वर पोलिसात घटनेची नोंद
वार्ताहर/ विजापूर
विजापूर जिह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी गावाजवळ शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास कार आणि सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष, एक स्त्राr व एका मुलाचा समावेश आहे. अर्जुन कुशलसिंग राजपूत (वय 32), मेघराज अर्जुनसिंग राजपूत (वय 12 रा. बरटगी तांडा, तिकोटा तालुका, विजापूर), रविनाथ सुनील पत्तार (वय 52, रा. मुधोळ, जिल्हा बागलकोट), पुष्पा रविनाथ पत्तार (वय 40, रा. मुधोळ, जिल्हा बागलकोट) अशी मृतांची नावे आहेत.
जयश्री अर्जुन रजपूत, नायरा अर्जुन रजपूत आणि प्रेमसिंग अर्जुन रजपूत अशी जखमींची नावे असून सर्वजण विजापूर जिह्यातील रहिवासी आहेत. पत्तार व रजपूत कुटुंबातील सर्व सदस्य केए 28 डी 1021 क्रमांकाच्या कारमधून विजापूरहून जमखंडीला जात होते. त्यावेळी जमखंडी येथून सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रक क्रमांक केए 16 बी 6472 ची कारला समोरुन जोराची धडक बसली. त्यात कारमधील काही प्रवाशांना जीव गमवावा लागला तर काही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बबलेश्वर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनातून मृतदेह बाहेर काढले. एसपी ऋषिकेश सोनावणे व इतर अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनेची नोंद बबलेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे.