तवंदी घाटात अपघातात चार ठार
6 वाहनांची धडक : मृत निपाणी, भोज, खडकलाट, पट्टणकोडोली येथील रहिवासी : 6 गंभीर
वार्ताहर/तवंदी
तवंदी घाटात 6 वाहनांचा भीषण अपघात झाल्याने त्यामध्ये चार जण ठार तर सहा जण गंभीर झाल्याची घटना रविवार 15 रोजी हॉटेल अमर समोर सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. या अपघातामध्ये संतोष गणपती माने (वय 48, रा. भोज, ता. निपाणी), रेखा संजय गाडीवडर (वय 35, रा. खडकलाट), दिलदार आदिलशाह मुल्ला (रा. पट्टणकोडोली) व जबीना महंमदहुसेन मकानदार (वय 58, रा. दर्गाह गल्ली, निपाणी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सानिया नियाज मुल्ला (वय 22), परवीन दिलदार मुल्ला (वय 55), श्रेया निगुडे (वय 24, रा. हुबळी) मंजुनाथ तेंडुलकर (वय 52, रा. हावेरी), सपना निगुडे (वय 55 रा. हुबळी) उशर सय्यद शेख (वय 8, रा. कोल्हापूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, मालवाहू ट्रक क्रमांक टीएन बीएच 3762 हा बेंगळूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, तवंदी घाटात दुसऱ्या वळणावर आल्यानंतर ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दोन कार, टेम्पो यांना जोराची धडक देत कंटेनर दुभाजकाजवळ जाऊन थांबला. या भीषण अपघातात चौघेजण ठार झाले. तर या अपघातात दोन कार व दुचाकीचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातामुळे तवंदी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याने जवळपास वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक उमादेवी, उपनिरीक्षक रमेश पवार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. अवताडे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विजय दाईंगडे, संतराम माळगी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अवजड वाहने व अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली.
सुमारे तासभर वाहतूक खोळंबली
अपघातामुळे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. गंभीर जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काहींना निपाणीतील खासगी रुग्णालयात तर काहींना कोल्हापूर येथे पाठविण्यात आले. अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मृत संतोष माने हे खडकलाट येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.