माजी कसोटीपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे सर्वांत वयोवृद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे मंगळवारी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. भारताचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होत. गायकवाड हे 95 वर्षांचे होते.
गेल्या 12 दिवसांपासून बडोद्याच्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे कुटुंबातील सूत्रांनी सांगितले. 1952 ते 1961 दरम्यान ते भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. उजव्या हाताने खेळणाऱ्या दत्ताजीराव यांनी 1952 मध्ये लीड्स येथे इंग्लंडविऊद्ध पदार्पण केले होते आणि ते अंतिम आंतरराष्ट्रीय सामना 1961 मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविऊद्ध खेळले.
रणजी ट्रॉफीमध्ये गायकवाड यांनी 1947 ते 1961 या काळात बडोद्याचे प्रतिनिधीत्व केले. त्यात त्यांनी 14 शतकांसह 47.56 च्या सरासरीने 3139 धावा जमविल्या. 1959-60 च्या मोसमात महाराष्ट्राविऊद्ध काढलेल्या नाबाद 249 धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी होती. माजी फलंदाज दीपक शोधन यांचे अहमदाबाद येथे 2016 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाल्यानंतर ते भारतातील सर्वात वयोवृद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू बनले होते.
अपघाताने भारतीय कर्णधार बनलेले खेळाडू असे म्हणता येणाऱ्या दत्ताजीराव गायकवाड यांची फटकेबाजी ही विजय हजारे यांच्या फटक्यांच्या तोडीस तोड होती आणि त्यांचा कव्हर ड्राईव्हचा फटका तर पाहण्यासारखा असायचा. बडोद्याच्या या उल्लेखनीय खेळाडूकडे असलेली प्रतिभा पाहता ते 11 पेक्षा जास्त कसोटी खेळायला हवे होते. पण 50 च्या दशकात बॉम्बेच्या (मुंबई) संघांना सतावणारे त्यांचे ते कव्हर ड्राईव्ह सर्वोच्च स्तरावर फारसे कधी पाहायला मिळाले नाहीत. त्यांची कसोटी सरासरी 20 पेक्षा कमी राहिली आणि तेव्हा राष्ट्रीय संघ जिंकण्यापेक्षा हरत जास्त होता. 1959 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यात त्यांनी पाचपैकी चार कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले खरे, पण हा दौरा भारतासाठी खूप खराब गेला.