माजी आरबीआय गव्हर्नर व्यंकिटरमणन यांचे निधन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस. व्यंकिटरमणन यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. ते डिसेंबर 1990 ते डिसेंबर 1992 या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांच्या कार्यकाळात देश मोठ्या आर्थिक संकटात होता. प्रशासनाचा खर्च भागविण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडचे सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती.
त्यांच्याच कार्यकाळात विदेशीं चलनाच्या दरासंबंधीही मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, या समस्यांचे कारण रिझर्व्ह बँक नव्हती, तर त्या काळात जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती, त्यामुळे ती परिस्थिती ओढविली होती. तसेच देशाची आर्थिक धोरणे त्यावेळी समाजवादाच्या मार्गावर जाणारी होती. त्यामुळे विकासदर अत्यंत धिमा होता. तशाही परिस्थितीत त्यांनी रिझर्व्ह बँकेचे व्यवहार तुलनेने योग्य प्रकारे हाताळले होते, असे मत आहे.
सेबी प्रमुखांशी मतभेद
व्यंकिटरमणन यांचे तत्कालीन सेबी प्रमुख जी. व्ही. रामकृष्ण यांच्याशी तीव्र मतभेद होते. ते एकमेकांना भेटण्यासही तयार नव्हते. त्यावेळी सेबीचे एक सदस्य व्ही. बी. रेड्डी यांनी वित्तबाजारांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गव्हर्नरांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना केली होती. तशा आव्हानात्मक काळात त्यांनी रुपया या भारतीय चलनाची पत सांभाळण्याचे कार्य उत्तमरित्या सांभाळले अशी त्यांची प्रशंसच केली गेली होती. रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. त्यावेळच्या केंद्र सरकारशी त्यांचे संबंध चांगले होते.