भाजपची चार सदस्य समिती स्थापन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने चार खासदारांची समिती नियुक्त केली आहे. बिप्लव कुमार देब, रविशंकर प्रसाद, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार अशी या खासदारांची नावे आहेत. 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतरही या राज्यात मोठा हिंसाचार झाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर देखील या हिंसाचाराची पुनरावृत्ती झाली असून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयांमध्ये आश्रय घेतला आहे.
तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि या पक्षाशी संबंधित असणारे गुंड विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करीत आहेत. त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होईल अशी स्थिती निर्माण करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणा मूक प्रेक्षक बनल्या आहेत. कोलकाता उच्च न्यायालयानेही या हिंसाचाराची दखल घेतली असून राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांच्या नियुक्तीला कालावधीवाढ दिली आहे. लोकसभा निवडणूक संपूर्ण देशात झाली. तथापि, पश्चिम बंगाल वगळता इतर कोणत्याही राज्यामध्ये असा हिंसाचार झालेला नाही. भारतीय जनता पक्षाची समिती राज्याचा दौरा करणार असून या हिंसाचारासंबंधी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे, अशी महिती रविशंकर प्रसाद यांनी दिली.