बायपासमधील न्यायप्रविष्ट जागेतील खडी काढून घेण्यास पाडले भाग
ठेकेदाराला शेतकऱ्यांनी धरले धारेवर : न्यायप्रविष्ट जागेत काम न करण्याची तंबी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासमध्ये जमीन गमावलेले शेतकरी आक्रमक बनले आहेत. चार दिवसांपूर्वी बेकायदा बायपासचे काम बंद करूनदेखील पुन्हा न्यायप्रविष्ट जमिनीतून रस्त्याचे काम सुरू ठेवल्याने बुधवारी शेतकऱ्यांनी ठेकेदार व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. इतकेच नव्हे तर न्यायप्रविष्ट जमिनीतील खडी काढून घेण्यास भाग पाडले. सुपीक जमिनीतून बायपास रस्ता केला जात असल्याने त्याला गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. रस्त्यात जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याऐवजी भलत्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
रस्त्यांची वर्क ऑर्डर देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. तरीदेखील वर्क ऑर्डर दिली जात नाही. झिरो पाँईट निश्चित होत नाही तोपर्यंत रस्त्यांचे काम करण्यात येऊ नये, असा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत न्यायप्रविष्ट जागेतून रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे.
हलगा-मच्छे बायपास संदर्भात म्हणणे मांडण्याची सूचना उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण आणि विशेषभूसंपादन अधिकाऱ्यांना केली आहे. असे असताना ठेकेदारांकडून न्यायप्रविष्ट जागेतूनही रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी रस्त्याचे काम बंद पाडले होते. तरीदेखील पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती समजताच बुधवारी पुन्हा शेतकऱ्यांनी वडगाव शिवारात धाव घेतली. ज्या न्यायप्रविष्ट जागेत खडी टाकून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. तेथील खडी काढून घेण्यास ठेकेदाराला भाग पाडले. न्यायालयाच्या सूचनेचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला शेतकऱ्यांनी धारेवर धरत जाब विचारला.