माहेरी जाण्याच्या वादावादीनंतर पतीकडून पत्नीचा कुऱ्हाडीने खून
खुनानंतर पतीनेही गळफासाने संपविले जीवन
बेळगाव : पत्नीचा खून करून पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कित्तूर तालुक्यातील तुरकर शिगीहळ्ळी येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे. कित्तूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. यल्लव्वा शिवाप्पा कंबळी (वय 46) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पत्नीच्या खुनानंतर पती शिवाप्पा सन्नबसाप्पा कंबळी (वय 50) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
गेल्या आठवड्यात यल्लव्वाच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे ती मेकलमर्डी येथील आपल्या माहेरी गेली होती. मंगळवारी सासरी परतली होती. यल्लव्वा व शिवाप्पा दाम्पत्याला दोन मुले आहेत. एक मुलगा नातेवाईकांच्या गावी गेला होता तर दुसरा मुलगा बेलूर औद्योगिक वसाहतीत कामावर गेला होता.यल्लव्वा हिने गोड जेवण घेऊन आपल्या माहेरी जाण्याचे सांगितले. मात्र, पतीला ते मान्य नव्हते. तू माहेरी जाऊ नकोस, असे तो तिच्यावर दडपण आणत होता. तरीही आईच्या क्रियाकर्मात भाग घेण्यासाठी यल्लव्वा माहेरी जाण्याची तयारी करीत होती. त्यावेळी पती-पत्नीमध्ये जोराचे भांडण झाले. भांडणानंतर कुऱ्हाडीने घाव घालून शिवाप्पाने पत्नीचा खून केला. नंतर स्वत:ही त्याने आपले जीवन संपविले आहे.