‘आयपीएल’ नव्हे, देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रीत करावे
रिषभ पंतचा नवोदित क्रिकेटपटूंना सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला वाटते की, आयपीएलचे आकर्षण समजण्यासारखे आहे, परंतु नवोदित क्रिकेटपटूंनी नेहमीच देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कारण ‘बाकी सर्व काही’ त्यानंतर येते. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा पंत हा भाग होता, परंतु त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्याने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
‘लहानपणापासूनच माझे एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे भारतासाठी खेळणे. मी कधीही आयपीएलमध्ये खेळण्याचा विचारही केला नव्हता. मला वाटते की, आज लोक आयपीएलवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत. अर्थात, ते एक उत्तम व्यासपीठ आहे. परंतु माझ्या मते, जर तुमचे ध्येय तुमच्या देशासाठी खेळण्याचे असेल, तर आयपीएलसह इतर सर्व काही अखेर जाग्यावर पडेल’, असे पंतने जिओ-हॉटस्टारला सांगितले आहे.
‘जर तुमच्याकडे ती मोठी मानसिकता असेल, तर यश नक्कीच मिळेल. मला नेहमीच वाटत होते की, मी एक दिवस भारतातर्फे खेळेन आणि देवाचीही कृपा राहिली. 18 व्या वर्षी मला पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि मी त्याबद्दल आभारी आहे’, असे हा 27 वर्षीय खेळाडू म्हणाला. पंत त्याच्या खेळण्याच्या आक्रम शैलीसाठी ओळखला जातो आणि त्याच्या काही वैशिष्ट्यापूर्ण फटक्यांमध्ये एका हाताने षटकार खेचणे समाविष्ट आहे. यामध्ये बॅट त्याच्या हातातून अनेकदा निसटते. सामन्याच्या परिस्थितीनुसार मी तो धोका पत्करण्यास तयार असतो, असे त्याने सांगितले. पंत म्हणाला की, तऊणपणी जिम्नॅस्ट राहिलेला असल्याचा त्याला क्रिकेटपटू म्हणून वावरताना खूप मदत झाली आहे.