मान्सूनचा फायदा ‘एफएमसीजी’ला होणार
ग्रामीण आणि शहरी भागातील मागणी वाढण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षी देशात पावसाळ्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवल्यानंतर, एफएमसीजी कंपन्यांना देशातील शहरी आणि ग्रामीण भागात विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की यावर्षी पावसाळ्यात देशात 87 सेंटीमीटरच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा 5 टक्के जास्त पाऊस पडेल.
ग्राहकोपयोगी कंपन्यांचे म्हणणे आहे की, देशात सलग चौथ्या वर्षी पुरेसा पाऊस पडेल असा अंदाज आहे. या कंपन्यांचे म्हणणे आहे की देशातील 65 टक्के लोकसंख्या देशातील ग्रामीण भागात राहते. कंपन्यांच्या मते, खरीप पिकांमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल, ज्यामुळे त्यांनाही फायदा होईल. सरकारने चालू आर्थिक वर्षात वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर न लावण्याची घोषणा केली आहे. तसेच, देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज लोकांना खर्च करण्यासाठी अधिक बळ देऊ शकतो.
एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु मलिक म्हणाले, ‘सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडल्यास ग्रामीण भागात मागणी वाढेल. गेल्या काही महिन्यांपासून या भागात मागणीत सुधारणा दिसून आली आहे.
आता जर पाऊस चांगला राहिला तर मागणी वाढेल
‘मलिक म्हणाले की अन्नधान्य महागाई सुमारे 4 टक्क्यांच्या आसपास आहे. वाढत्या उत्पन्नामुळे महागाई आणखी कमी होऊ शकते. इतर ग्राहक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही असेच मत व्यक्त केले. चांगल्या पावसामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातून मागणी वाढेल असे त्यांनी सांगितले.
शहरी मागणीत अगोदरच सुधारणा
पार्ले प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष मयंक शाह म्हणाले, ‘शहरी मागणीत सुधारणा आधीच दिसून येत आहे आणि सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज ग्रामीण मागणीसाठी चांगली बातमी आहे. चांगला पाऊस ग्रामीण भागांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे उत्पादन खर्च नियंत्रणात राहण्यास देखील मदत होईल कारण उत्पादन देखील जास्त असण्याची अपेक्षा आहे.‘